Saturday, June 2, 2012

स्वातंत्र्य आले रे आले ......

             तस पाहिले तर फक्त शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे, असे नाही. शेतकऱ्यांना लुबाडणारे व्यापारी, दुकानदार, कंपन्या, शाळेतील मुले, आजी-आजोबा, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हे तर वाट बघतातच... पण फरक एवढाच आहे कि, शेतकरी मायबाप डोळ्यात पाणी आणून वाट बघतात तर बाकीचे इतर लोक डोळ्यात पाणी आणायला लावुन वाट बघायला लावतात. त्यांचे आणि पावसाचे काही देणेघेणे नाही विशेषतः पांढरे बोके मलई तोंडात घालत - घालत पावसाचे भांडवल करतात. मी स्वतः दुष्काळी पट्टयात राहणारा आहे, त्यामुळे पांढरे बोके वावरताना मी पाहिलेले आहे. किती मलई खायची, कुठे खायची, कधी खायची याचा काही नेम नाही. तुम्ही सर्वांनी ती जुनी दोन मांजरांची / बोक्यांची गोष्ट वाचली किंवा ऐकली असेलच. त्यावेळी शिक्षणाची म्हणावी अशी प्रगती नव्हती आणि जसा काळ बदलला तसे बोक्यांच्यात पण Generation Gap आलाच कि हो... तर आताचे बोके थोडे अडवान्स पद्धतीचे आहेत. आता तुम्ही म्हणाल ते कसे काय ?? बघा, भारत स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊन गेली तेंव्हापासून आजअखेर नाही... नाही... मुघलांच्यावेळी त्रास झाला म्हणुन छत्रपती शिवाजीराजे यांनी बंड केले आणि स्वराज्य स्थापन केले तेंव्हा माझे पूर्वज खुशीत होते राव... मी वाचले होते आणि आमचे आबासाहेब देखील सांगत होते, त्यांचे पूर्वज खुशीत होते. त्यानंतर ब्रिटीश आले आणि आमच्या शेतकरी बांधवांसह, स्थानिक व्यापारी, संस्थानिक, उच्चवर्गीय सारेच ब्रिटिशांच्या ग्रहणात अडकले असे म्हणतात.

          यावेळी सर्वांना लढायीचा अनुभव आलेला होता. आणि साक्षात छत्रपती शिवाजीराजे यांनीच गनिमीकावा शिकविला होता. हां शिकवला होतो पण काळाच्या ओघात 'गनिमीकावा' जिंकण्यासाठी वापरायचा असतो  हेच तेवढे लक्षात राहिले पण केंव्हा, कुठे, कसा आणि महत्वाचे म्हणजे कोणाविरोधात वापरायचा हे मात्र सर्वजण विसरलो. या सर्वांच्यामध्ये माझे भोळेभाबडे शेतकरी बांधव एकच शिकले, 'माझ्या राजाच राज्य हाय, राजा माझा हाय.. माझ्यावर संकट येऊ देणार नाय... माझी पोर-बाळ सुखानं खाणार.... तेंव्हा अश्या कितीतरी आशा एकट्या महाराजान पुऱ्या केल्या होत्या ....

          अगदी तेंव्हापासुन शेतकरी राजा विसरुनच गेला आहे. राजे गेले,, गोरे साहेब आले पण या बापड्यांना काही काळ जाणविलेच नाही, माझ्या महाराजाची सत्ता गेली आहे. (त्यावेळी प्रामाणिक नेते होते आणि आताही आहेत यात वादच नाही, पण कोणाशी प्रामाणिक रहायचे याचे त्यांना भानच राहिले नाही एवढाच फरक आहे) या नेत्यांनी नंतर ओळखले होते; जसे छत्रपती शिवाजीराजेनी बारा मावळातील मावळ्यांच्या मदतीने मोघलांची सत्ता घालवुन स्वराज्याची स्थापना केली आणि त्या आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा शेतकरी आणि कामगारांना जागे केले  पाहिजे तर आणि तरचं स्वातंत्र्य मिळणार आहे आणि हो हो हे घडलही अगदी असेच जवळपास दीडशे वर्षांची सत्ता घालवली फक्त आणि फक्त या शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर ... हो हो अगदी खरंय हे. 
   
          जोपर्यंत शेतकरी आणि कामगार जागे होत नाहीत तोपर्यंत ब्रिटीशच काय पण एखादयाने काळा दगड जरी आणून ठेवला आणि सांगितलं कि हा तुमचा राजा तर भारतीय मान्य करतील. हो, इतकी साधी, सरळ आणि भोळी आहेत माझी माणस. पण कुणीतरी जाग करायची वाट बघत्यात...




पण लक्षात ठेवा, इतिहास आजही ठाम आहे, पुनरावृत्ती होऊ देवू नका. कोणी शिवाजी येणार नाही की महात्मा येणार नाही. शिवाय आजकाल एक म्हण प्रचलित आहे, "शिवाजी जन्माला येऊ दे, पण तो शेजारच्या घरात" ती खरी अथवा वास्तवात उतरू देवू नका. शिवाजीराजे जन्माला येऊ द्या पण एकाच ठिकाणी नको,,,,,, प्रत्येकाच्या घरात जन्माला येऊ द्या. प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनण्याची गरज आहे आणि प्रत्येक पुरुषाने "प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।" रु शिवधोरणाचा स्वीकार करून मार्गक्रमण केले पाहिजे. क्रांतीने होरपळलेल्या जनतेला सुराज्य पाहिजे. स्वातंत्र्य मिळुन अजुन एक पिढीही गेली नाही तोपर्यंत पुन्हा क्रांतीची वाट पाहू नये....

- B. Mahesh, INDIA