Saturday, February 7, 2015

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा.... संकलन - श्री. मिलींद पोळ, सांगली

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा....
संकलन - श्री. मिलींद पोळ, सांगली
दि.07/01/2015

जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.

माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे.

ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.

जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.

ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.

अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे  घेतात. व सरपंच / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही.

वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.

२६ जानेवारी            - प्रजासत्ताक दिन
१   मे                       - कामगार दिन
१५ ऑगस्ट              - स्वातंत्र्य दिन
२   ऑक्टोबर           - गांधी जयंती

या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते.

सभेचा अध्यक्ष

आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.

ग्रामसभेत कसे बोलावे ?

ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.

सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.

सभेचे कामकाज

ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.

अत्यंत महत्वाचे -

पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.

ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास घडतात.

ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो.

आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही.

आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात.

आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.

-------------------------------------------
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान, सांगली
-------------------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
Website - www.mazisheti.org
Facebook - www.facebook.com/agriindia
Twitter - mazishetifoundation
Plus - mazisheti foundation
LinkedIN - mazisheti foundation
Whatsapp - 9975740444
----------------------------------------
**** सर्व शेतकर्यांना माहितीची गरज आहे. तुमच्या संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांना आमचेसोबत जोडा.
**** न्यूज व इतर अपडेट्स करिता शेतकरी बंधुनी <नाव_गट नं._तालुका_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> माहिती 09975740444 या नं.वर कळवा तसेच हा नंबर फोनबुक मध्ये समाविष्ट करायला विसरु नका.
**** शेतकरीसाठी विविध स्तरावर निस्वार्थीपणे काम करायची इच्छा असेल तर आमचेशी संपर्क करा.
**** तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.

Thursday, February 5, 2015

वांगी

हवामान 

वांगे हे कोरड्या आणि उष्ण हवामानात येणारे पीक आहे. ते 13 ° से पासून 21 ° से तापमानात घेतले जाते. वांगी पिकाला ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस मानवत नाही. 

जमीन
जमिनीची तयारी चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी पाण्याचा निचरा होणारीसुपीक व मध्यम काळी जमीन निवडावी. 

मशागत
प्रथम जमिनीची आडवी-उभी नांगरट व कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. 

बियाणे 
रुचिराप्रगतीपुसा पर्पल लॉगअरुणापुसा पर्पल राउंडपुसा पर्पल क्लस्टरपुसा क्रांतीमांजरी गोटाकृष्णाफुले हरितफुले अर्जुनको-1,को-व पी.के.एम. 1.
हरित कृष्णा, MH१०

सुधारित जातीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम तर संकरित जातीसाठी हेक्‍टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे असते. 

बिज प्रक्रिया 
पेरणीपूर्वी बियाण्यास 10%फॉरेट 20 gm / थायरम 3gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन,सहारा) 1gm/kg ची प्रक्रिया करा. रासायनिक प्रक्रीये नंतर ट्रायकोडर्माची@5gm/kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा. लागवडी आधी रोपांची VAM + नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचत होते. 

लागण कालावधी 
हंगाम
बियाणे पेरणी  
रोपे लागण
उन्हाळी
जानेवारी २रा आठवडा
फेब्रुवारी
पावसाळी
जुन २रा आठवडा
जुलै-ऑगस्ट
रब्बी किंवा हिवाळी
सप्टेंबर अखेरपर्यंत
ऑक्टोबर-नोव्हेंबर 

लागण पद्धत 
वांग्याची रोपे तयार करणेसाठी गादीवाफे साधारणतः 3 x 2 मीटर आकाराचे तयार करूनवाफा 1 मीटर रुंद व 15 सें.मी. उंच करावा. 
लागवड
अंतर CM
लागवड
अंतर CM
हलक्‍या जमिनसाठी
75 x 75
कमी वाढणाऱ्या जातीसाठी
90 x 75 
मध्यम जमिनीसाठी
90 x 75
संकरित जातीसाठी
90 x 90
भारी जमिनीसाठी
120 x 90
जास्त वाणाऱ्या जमिनीसाठी
120 x 90
वांग्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचा काळा व सोनेरी रंगाचा मल्चिंग पेपर वापरला जातो. काळा रंग आतील बाजूला व चंदेरी/सोनेरी रंग वरच्या बाजूला ठेवून दोन्ही बाजूने पेपर जमिनीत गाडून लागवड केली जाते. 

खतव्यवस्थापन
प्रत्येक वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन घमेले टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत टाकावे. 
रोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (एकरी 3 ते 4 टन) शेणखत मिसळून द्यावे. 
रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे. 

वांगी पिकासाठी मध्यम काळ्या जमिनीसाठी एकरी 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश आवश्‍यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे आणि अर्धे उरलेले नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्यानेदुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा. 

रासायनिक खते चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया),20 किलो स्पुरद (125 किलो एसएसपी) व 20 किलो पालाश (34 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकावे. 

लागवडीनंतर 10-15 दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया) प्रती एकर लागवडीनंतर 20 आणि 45 दिवसांनी द्यावे.

पाण्यात विरघळणारी खते चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 5gm/Ltr पाण्यातून फवारा. 

चांगल्या फुलधारणा व फळांचा विकास होण्यासाठी फुलो-यापूर्वी 19:19:19 5gm/Ltr आणि 0:52:34 5gm/Ltr पाण्यातून फळे तयार होताना फवारा. 

सुक्ष्म अन्नद्रव्ये  लागवडीनंतर 40-45 दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ धारणा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + बोरान 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ पोसत असतांना 13:0:45 4 ते 5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अन्नद्रव्यांची कमतरता लोह कमतरता. खालची पाने हिरवीनवी पाने पांढरट दिसतात. नियंत्रण- चिलेटेड आयर्न एकरी 125-150 ग्रॅम 130 लिटर पाण्यातून फवारा संप्रेरके पिकाच्या प्राथमिक वाढीच्या काळात 1Ltr/acre ह्युमिक असिड किंवा 5 kg/acre ग्रॅन्युअल्स वापरल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी ट्रायकोन्टनल होर्मोन 500 ppm हे 200Ltr पाण्यातून 100ml इतक्या प्रमाणात 15दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा फवारा. 

पाणी व्यवस्थापन 
हलके पाणी द्यावे. रोप 5 ते 6 आठवड्यात रोपे 12 ते 15 सें.मी. उंचीची झाल्यावर लागवड करावी. 
उन्हाळी हंगामात पिकाला 5-6 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्या. पावसाळ्यामध्ये पिकाची पाण्याची गरज पाहून पाणी द्यावे. 
ठिबक सिंचन आराखडा - 
प्रथमतः 120 सें.मी. रुंदीचे गादीवाफे व दोन गादीवाफ्यातील अंतर 30 सें.मी. असे गादीवाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक गादीवाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून घ्याव्यात. 
नंतर या लॅटरल लाइनवर 60 सें.मी. अंतरावर 4 लिटर प्रतितास ड्रीपर व दोन ट्रिपरमधील अंतर 50 सें.मी. असेल तर 3.5 लिटर प्रतितास क्षमतेचे ड्रीपर बसवावे. 
दोन लॅटरलमधील अंतर 1.5 मी. ठेवावे. 
लागवड करताना जोड ओळ पद्धतीने करावी. दोन ओळींमधील अंतर 90 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 75 किंवा 60 सें.मी. ठेवून लागवड करावी. 

तण व्यवस्थापन 
लागवडी/पेरणीनंतर लगेच परंतु पिक उगवण्यापूर्वी पेंडीमिथालीन 30 EC (स्टॉंम्प,धानुटॉप)150ml/15Ltr पाण्यातून फवारा. उभ्या पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी एकदा कोळपणी करावी. 

कीड नियंत्रण 
फुलकिडे आणि मावा 
इमीडाक्लोप्रिड70WG(अॅडमायर,अॅडफायर) 5gm किंवा इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) 10 gm/15 Ltr पाण्यातून 12 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा. 

कोळी 
या किडीमुळे उत्पादनात 35% घट होवू शकते.नियंत्रणासाठी स्पीरोमेसिफेन 22.9SC (ओबेरोन,वोल्टेज) 20ml किंवा प्रोपारगाईट 57EC (ओमाइट,सिंबा) 40ml/15Ltr पाण्यातून फवारा 

खोड आणि फळे पोखरणा-या अळ्या 
खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 40% + सायपर मेथ्रिन 4% (रॉकेटप्रोफेक्स सूपर) 350ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC400ml /200Ltr पाण्यातून प्रती एकर फवारा. किंवा खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम EM-1) 5% SG 7gm किंवा क्लोरॅंट्रॅनीलिप्रोल 18.5%SC (कोरॅजन) 6ml किंवा फ्लूबेनडामाइड 39.9SC (फेम) 5ml किंवा फ्लूबेनडामाइड 20WG(फ्लूटॉन टाकूमी)@10gm/15Ltr पाण्यातून फवारा. 

पांढरी माशी 
पांढ-या माशीमुळे उत्पादनात 40% घट होते व विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.नियंत्रणासाठी अ‍ॅसीटामिप्रिड 20SP (धनप्रितरेकॉर्ड) 5gm किंवा डायफेनथीरॉन 50WP(पेगासास,पोलो) 20gm/15Ltr पाण्यातून फवारा 

रोग नियंत्रण 
भुरी 
या रोगामध्ये पानांवर पांढरी भुकटी दिसून येते नियंत्रणासाठी गंधक 500gm प्रती एकर 200Ltr पाण्यातून फवारा. 

रोप मर
थंड,ढगाळ हवानाम,उच्च आर्द्रता ओली माती व रोपांची गर्दी यामुळे मर रोग येण्याची शक्यता आहे. मर रोगामध्ये पिक पूर्णपणे मरून जाते. मेटालेक्सील 8%+ मॅनकोझेब 64%WP (रीडोमीन MZ,कॉरोमील) 2gm/Ltr पाणी याप्रमाणे पेरणीपूर्वी भिजवणी करा. 

बोकड्या रोग 
मावाच्या प्रादुर्भावामुळे पसरतो. 25%WG थायामेथोक्सॅम(क्रूसर,अक्टारा) @ 5gm/15 Ltr ची फवारणी करा. 

करपा
टेब्युकोनॅझोल 25ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारा. पानावरील ठिपके क्लोरोथॅलोनील (कवचजटायु) @ 15gm/10Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल 25% EC (रडारटिल्ट) 10 ml/Ltr ची फवारणी. 

इतर समस्या 
पिवळेपणा 
पिवळेपणा कमी करण्यासाठी प्रोपिनेब 70WP 35gm+19:19:19 75gm/15 Ltr पाण्यातून फवारा. 

सुत्रकृमी 
सुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ थांबते व उत्पादनावर परिणाम होतो. सुत्रकृमी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 3G (फ्युराडन,डाइफ्युरान फ्युरी)@10-15kg/एकर प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार वापरा. 

कापणी आणि काढणी पश्चात तंत्र 
योग्य अवस्था आणि तंत्र 
रोप लावणीनंतर 10-12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घात होते व जुन फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही. 4-5 दिवसांच्या अंतराने 10-12 वेळा वांग्याचे तोडे करावेत.साधारणपणे 3-3.5 महिने वांग्याची काढणी चालू असते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन - 
सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या जमिनीत टोमॅटोमिरची भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या ही पिके घेतली असल्यास तिथे वांग्याची लागवड करू नये.

रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम टाकावे. तसेच रोपावर डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडॅक्‍लोप्रीड (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) च्या द्रावणामध्ये बुडवून नंतर लागवड करावी. 
कामगंध सापळे 10 (दहा) प्रतिहेक्‍टर वापरावेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी. 
लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडेमावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे. 

रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर 2 आठवड्यांनी 20 मिली मॅलेथीऑन 50% किंवा 2.5 मिली फॉस्फोमीडॉन 85% किंवा डायमेथोएट 30% 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारा. 
लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. या किडीसाठी सायपरमेथ्रीन (25 टक्के प्रवाही) 5 मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 3 मि.लि. 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. 
वांग्यामधील बोकड्या/ पर्णगुच्छ याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. यासाठी तुडतुड्यांचे वरीलप्रमाणे नियंत्रण करावे.

30 ते 40 टन प्रति हेक्‍टर उत्पादन मिळू शकते.


Wednesday, January 28, 2015

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान:
दि. 27/01/2015

तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी बागेतील स्वच्छतेला द्या महत्त्व
- नेचर अग्री, सोलापुर

हिवाळ्यामध्ये तेलकट डाग रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत असतात. या काळातच बागेतील स्वच्छता आणि रोगट अवशेष नष्ट करण्याकडे लक्ष दिल्यास रोगाचा प्रसार रोखणे शक्‍य होईल. 🍊🍎

तेलकट डाग हा रोग झान्थोमोनास ऍक्‍झानोपोडीस पुनिका या जिवाणूमुळे होतो. 

हंगामानुसार प्रादुर्भाव - 
सर्वेक्षणामध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव मृग बहाराच्या वेळी (म्हणजेच जून ते ऑक्‍टोबर महिन्यामध्ये) सर्वात जास्त असतो. त्या खालोखाल आंबे बहाराच्या वेळी (म्हणजे मार्च ते मे महिन्यापर्यंत) डाळिंबावर तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. तेलकट डागाचा सर्वांत कमी प्रादुर्भाव हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यात म्हणजे सर्वसाधारण हस्त बहारात दिसून येतो. जिवाणूंची संख्या दमट व उष्ण हवामानात व पावसाळी हवामानात खूप मोठ्या प्रमाणात वाढते. थंड हवामानात तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंची संख्या त्यांच्या नैसर्गिक वेगाने वाढत नाहीत. याचा फायदा घेऊन डाळिंब बागायतदारांनी घेऊन बागेतील तेलकट डाग रोगाचे अवशेष नष्ट करावेत. 

तेलकट डाग रोगास पोषक हवामान - 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढ व प्रसारासाठी 25 ते 32 अंश सें. तापमान आणि 36 ते 88 टक्के आर्द्रता फार पोषक ठरते. 
- वातावरणातील किमान तापमान 18 ते 28 अंश से. आणि कमाल 30 ते 35 अंश से. तापमान या रोगाच्या वाढीस आणि प्रसारास पोषक असल्याचे आढळून आले आहे. (यानुसार 18 अंश सें.पेक्षा कमी तापमान रोगवाढीस पोषक नाही.) 
- तेलकट डाग रोगाच्या वाढीस वातावरणातील किमान आर्द्रता 21 ते 84 टक्के, तर कमाल आर्द्रता 50 ते 92 टक्के ही पोषक ठरते. 
- हिवाळ्यात किमान तापमान 18 अंश से.पेक्षा कमी राहते. या काळात रोगाचे जिवाणू सुप्तावस्थेत जातात. याच काळात बागेत स्वच्छता मोहीम राबविल्यास रोगाच्या उत्पत्तीस आळा बसतो. 

तेलकट डाग रोगाची लक्षणे - 
पानांवरील लक्षणे - 
सर्वप्रथम रेखीव ते अनियमित लहान आकाराचे (2-5 मि.मी.) करड्या काळसर रंगाचे, तेलकट पाणीदार डाग पानावर दिसतात. कालांतराने हे डाग आकाराने मोठे होऊन गर्द तपकिरी ते काळे होतात. डागाभोवती पोकळ पिवळसर पाणीदार कडा दिसते. एक ते अनेक ठिपके एका पानावर आढळून येतात. काही वेळेस हे सर्व ठिपके एकमेकांत मिसळतात. परिणामी पूर्ण पान पिवळे पडून गळून पडते. कधीकधी पानाची मध्यरेषा व शिरांनाही लागण होऊन त्या काळसर पडतात. नंतरच्या अवस्थेत पाने पिवळसर काळपट होऊन गळतात. 

फांद्यांवरील लक्षणे - 
फांदीवर काळपट अथवा काळे खोलगट चट्टे आढळतात. कालांतराने हे चट्टे फांदीवर गोलाकार पसरतात. फांद्या त्या भागात तडकतात आणि थोडासाही दाब दिल्यास तुटतात. 

फूल आणि फळांवरील लक्षणे - 
कळ्या अथवा फुलांवर कदाचित लागण झाल्यास कॅलीक्‍सवर लक्षणे आढळतात. फळांवर लागण जास्त प्रमाणात होते. फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची लागण लवकर व जास्त प्रमाणात होऊन काळे ठिपके पडतात. ते कालांतराने वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. इंग्रजी एल (L) अथवा वाय (Y) आकारात फळांचा लागण झालेला भाग तडकतो. लागण वाढल्यास फळे तडकतात, दुभंगतात, आतील दाणे बाहेर पडतात व फळे गळतात. 
- मात्र, अतिरिक्त पाऊस व आर्द्रतेच्या परिस्थितीत मोठ्या डागावरसुद्धा भेगा आढळत नाहीत. हे डाग खोल मध्यभागी दबलेले आढळतात. पावसाळ्यात या डागावर पाणी साचल्यास जिवाणूचा प्रादुर्भाव वाढून द्राव चिकट पांढुरक्‍या रंगाचा बनतो. हाच द्राव त्याच जागी वाळल्याने या डागाला पांढरी चकाकी येते. 
- जिवाणू व सरकोस्पोरा बुरशीच्या प्रादुर्भावाने होणारे ठिपके रोगांची लक्षणे साधारणतः सारखीच असतात. खालील प्रकारे फरक लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात. 

शेतावरच करा तेलकट डाग रोगाचे निदान - 

ही चाचणी अतिशय सोपी असून, शेतावरच करता येते. 
- तेलकट डाग रोगग्रस्त पान किंवा फळ रोगट ठिपके वरच्या बाजूस येतील अशा प्रकारे सपाट जागेवर ठेवा. थेंबभर पाणी टाकल्यास दाट चिकट गढूळ द्रवात रूपांतरित झालेले दिसून येईल. रोगट भागातून पाण्यात होणाऱ्या जिवाणूच्या प्रवेशाने असे झालेले असते. रोगट ठिपके मोठ्या आकाराचे असल्यास जिवाणू जास्त प्रमाणात प्रवेश करतात व निदान अतिशय चांगल्या प्रकारे होते. रोगट ठिपके बुरशी वा इतर कारणाने पडले असल्यास पाणी तसेच राहते. 

- शेतात रोगनिदान करण्याची आणखी दुसरी पद्धत आहे. यामध्ये काचेच्या पात्रावर रोगट भागाचे लहान लहान तुकडे करून त्यावर पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकावे व ते हाताने कुस्करावे. द्रावण घट्ट व चिकट झाल्यास तो भाग तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे; अन्यथा द्रावण तसेच राहिल्यास अन्य बुरशीचा प्रादुर्भाव आहे, असे समजावे. 

पाऊस किंवा पाण्याचा तेलकट डाग रोग व जिवाणूवर होणारा परिणाम ः 
- तेलकट डाग रोगाच्या जिवाणूच्या वाढीस पाण्याची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पावसामुळे किंवा पाणी साचल्याने तेलकट डाग रोगाचे जिवाणू क्रियाशील होऊन रोग प्रसारास प्रारंभ होतो. अपरिणामकारक बुरशीनाशकांची किंवा कमी तीव्रतेच्या द्रावणांची फवारणी केल्यास त्या पाण्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. 
- हिवाळ्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने तेलकट डाग रोगाच्या वाढीस पोषक हवामान तयार होते. अशा परिस्थितीत बागेतील तेलकट डागाचे अवशेष व झाडावरील रोगाचे जीवंत डाग प्रसारामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. बागेत स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. 

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी स्वच्छता आवश्‍यक - 
- एकदा बागेत या रोगाचा शिरकाव झाल्यास त्याचे जिवाणू झाडाच्या अवशेषांवर जगतात व वर्षानुवर्षे बागेत राहतात आणि पोषक वातावरण मिळताच वाढीस लागतात. यासाठी जिवाणूंचा बागेत शिरकाव रोखणेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी लागवडीसाठी रोगमुक्त रोपांचा वापर आवश्‍यक आहे. 
- तेलकट डाग रोगाचा प्रसार एका हंगामातून दुसऱ्या व पुढील हंगामात प्रामुख्याने बागेत पडलेल्या रोगट अवशेषाद्वारेच होतो. 
- या रोगाचे विषाणू नुसत्या मातीत जिवंत राहत नाहीत. मात्र, बागेतील रोगग्रस्त पाने, फळे, फांद्यांमध्ये हे जिवाणू 240 दिवसांपर्यंत सहजपणे सुप्तावस्थेत जिवंत राहतात. वाढीस पोषक हवामान मिळताक्षणीच वेगाने वाढ होऊन रोग प्रसार होतो, म्हणून बागेत स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. गावपातळीवरच सर्वांनी मिळून स्वच्छतेचा कार्यक्रम राबविल्यास तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंचे उच्चाटन शक्‍य होईल. 

तातडीने करावयाच्या उपाययोजना - 
1. गावपातळीवर सर्वांच्या बागेत स्वच्छता मोहीम राबवणे. 
2. मागील हंगामातील फळांची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम. (2 ब्रोमो, 2 नायट्रोप्रोपेन, 1-3 डायोल) 50 ग्रॅम प्रति 100 लिटर प्रमाणात फवारावे. जर फळ काढणी पावसाळ्यात झाली, तर ब्रोमोपॉल 500 पीपीएम+ कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. (ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 100 लि. पाणी). 
3. संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 ते 4 महिने विश्रांती द्यावी. 
4. बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी. यासाठी इथेफॉन 1 ते 2 मि.लि. प्रतिलिटर फवारावे. रोगट फांद्याची छाटणी करावी. 
5. झाडाच्या खोडाला निमऑईल + ब्रोमोपॉल (500 पीपीएम) + कॅप्टन (0.5 टक्के)चा मुलामा द्यावा. 
6. बागेतील व बांधावरील गोळा केलेले तेलकट डागग्रस्त व इतर रोगट अवशेष सातत्याने जाळून नष्ट करावेत. 
7. बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर 60 किलो प्रतिहेक्‍टर किंवा कॉपर डस्ट (4 टक्के) (उपलब्ध असल्यास) 20 कि. प्रतिहेक्‍टर धुरळणी करावी. 
8. पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम + कॅप्टन 0.5 टक्के फवारावे. 
9. नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल (250 पीपीएम) किंवा बोर्डोमिश्रण (0.5 ते 1 टक्का) किंवा कॅप्टन (0.25) टक्के 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर फवारणी चालू ठेवावी. रोग दिसत नसल्यास 30 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 
10. ही फवारणी फळ काढणीपूर्वी 30 दिवस आधी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फळ काढणीच्या 20 दिवसांआधी बंद करावी. 

टीप- निर्यातक्षम डाळिंब बागेत रसायनांचा वापर करण्यापूर्वी कृषी संशोधन केंद्र वा कृषी  शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
~~~~~
* तुमची संस्था नोंदणीकृत असेल आणि तुम्हाला समाजसेवेची आवड असेल तर mazishetifoundation@gmail.com वर संपर्क करा.
~~~~
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
६४७, दसरा चौक, सावळज जि.सांगली ४१६३११ (महा.)
वेब - www.mazisheti.org
फेसबुक - www.facebook.com/agriindia
ईमेल - mazishetifoundation@gmail.com
whats app - 9975740444