Friday, November 27, 2015

कृषि विस्तारात बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर - इरफान शेख

कृषि विस्तारात बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर

महाराष्ट्राची विशेषतः मराठवाड्याची शेती अविकसित असण्याच्या अनेक कारणा पैकीच एक सर्वात मोठ कारण म्हणजे कृषि तंत्रज्ञानाचा अल्प विस्तार होय. अशी हजारो संशोधन आहेत जी लोकोपयोगी,शेतीतीत अल्प खर्चीक तंत्र आहेत पण दुर्दैवाने ती अद्याप सामान्य शेतकर्‍यांत रूजली, पोचली नाहीत. कृषि विस्ताराच मूलतत्व “ Learning by Doing” ( प्रात्यक्षिकातून शिकणे) हे होय. हे न होण्या मागचा मोठा अडथळा हा कुशल मनुष्य बळाचा अभाव होय.हा प्रश्न आत्ता काही अंशी सुटत असला तरी सुधारनेस आणखीन प्रचंड वाव आहे.सुधारणेचा वेगही कमीच आहे. 
दरम्यानच्या कालावधीत तंत्रज्ञान विशेषतः माहिती तंत्रज्ञानाची प्रगती अतिशय वेगाने होताना दिसते आहे.जादूची कांडी फिरवण्या इतका आयटी क्षेत्राचा वेग वाढतोय. “सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तंत्रज्ञानात शोधणं कदाचीत चूक ठरेलही पण या क्षेत्राचा वापर न करता निव्वळ दुर्लक्ष करन मात्र नक्कीच चूक ठरेल”.
शासकीय पातळीवर कृषि क्षेत्रात माहिती तंत्राचा वापर करण्याचा वेग गरजेपेक्षा कमी आहे पण याला नजुमानता खूप सारी खाजगी मंडळी आता या कृषि क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत, वेगाने आकर्षित होत आहेत. यातल्या मुख्य मुद्द्यावर येण्यापूर्वी आणखीन एक महत्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. माझ्या महितीतील एका कृषि मंडळात ३२ गाव आहेत आणि मागच्या साधारणपणे ३ वर्षाहून अधिक कालावधी पासून ४-६ कृषि कर्मचारी/अधिकारी या गावांचे अतिरिक्त वा नियमित काम पहात आहेत. एका कृषि सहाय्यकास २५०० हे. क्षेत्रावर काम करणे अपेक्षित असते पण इथे क्षमतेपेक्षा ४ ते ५ पट अधिक प्रभार आहे. असे अनेक ठिकाणी आहे. असे असताना मग ग्रामस्तरावरील कृषि कर्मचारी प्रतेक शेतकर्‍यां पर्यन्त पोचणे कसे शक्य होईल?
कृषि तंत्रज्ञान प्रसारातील आयटी वापरासाठी शासकीय पातळीच्या प्रयत्नांपुढे जाऊन खालील काही मंडळी काम करत आहेत.

१) भारत४इंडिया.कॉम- वेब चॅनल आणि मोबाईल अॅपद्वारे (व्हीडीओबेस) कृषी क्षेत्रातील घडामोडी, कृषी संस्कृती, संशोधन, यशोगाथा, नवीन प्रयोग, मार्केट तंत्र. शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणार नवीन माध्यम या बाबत माहिती इथे दिली जात आहे.
२) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस- M Krishi- शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे कृषी सल्ला. ग्राफ, Pictureचा वापर करून कृषि तंत्रज्ञान प्रसारित करण्यात येत आहे.. 
३) थॉमसन रॉयटर्स- रॉयटर्स मार्केट लाईट (myRML): मोबाईल SMSद्वारे शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती, स्पीड, अॅक्युरसी आणि फ्रीडम फ्रॉम बायस या तत्त्वांचं पालन. या सेवेचा भारतभर स्थानिक भाषेत प्रसार हवामान, आणि एप्प्लीकेशनच्या माध्यमातून हवामान अंदाज, नियमीत बाजारभाव,प्रमुख पीक निहाय शेती सल्ला दिला जात आहे.
४) इफको-एअरटेल- IKCL: मोबाईलद्वारे शेतीविषयक माहिती. व्हॉईस मेसेजद्वारे सेवा दिली जात आहे ज्यामुळे अशिक्षित शेतकऱ्यांनाही फायदा मिळतोय.
५) आय.आय.टी., मुंबई- अॅग्रोकॉम: वेबसाईटद्वारे शेतीविषयक माहिती, तज्ज्ञांचं मोठं जाळे आणि युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय.
६) मायक्रोसॉफ्ट- डिजीटल ग्रीन- व्हीडिओ डॉक्युमेंटरीद्वारे इंडिजीनस कृषी ज्ञानाचा प्रसार. शेतकऱ्यांच्या इनॉव्हेटिव्ह प्रयोगाच्या प्रसारावर भर दिला जात आहे. छोट्याच पण उपयुक्त विडिओ क्लिप्सच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान प्रसार केला जात आहे.
७) नोकिया- नोकिया लाईफ- मोबाईलवरून शेती, शिक्षण, मंनोरंजनविषयक माहिती दिली जात आहे. कृषी क्षेत्रात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा (ICT) म्हणजेच नवीन माध्यमांचा (वेब, डिजीटल, मोबाईल, सोशल) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फायदा प्रगतशील युवा शेतकऱ्यांना शेतमालाचं गुणवत्ताक्षम अधिक उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचं प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी होत आहे. म्हणूच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) युगातील तळागाळातील आपला शेतकरी खऱ्या अर्थानं `ग्लोबल` (Global+Local) बनत आहे.

८) व्हाटसप्प सोशल मीडियाचा कृषि क्षेत्रात वापर: कृषि-उन्नती,माझी शेती फाउंडेशन,आम्ही शेतकरी ग्रुप,श्री. संजीव माने, आष्टा, इत्यादि मार्फत नियमित कृषि  संबंधी मोफत शेतकरी सल्ला दिला जातोय. याची दखल तर मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी अमेरिकेत जाऊन सांगितली. या माध्यमातून कृषि क्षेत्रातील ऑडिओ,विडियो, मोठ्या प्रमान्त टेक्स्ट,या माध्यमातून वेगवेगल्या कृषि प्रश्नां संबंधी मागच्या दीड ते दोन वर्षा पासून जागृती कार्य सुरू आहे.
९) अप्प्स: गूगल प्ले स्टोर ला कृषि संबंधी  अॅग्रिकल्चर इन्फॉर्मेशन अप्प, क्रॉप इन्फो अप्प, योजनांची माहिती देणारे अप्प, कृषि निविष्ठांची माहिती देणारे अप्प, मार्केट लिंकेज देणारे अप्प असे अनेक एप्प्लीकेशन इत्यादीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नियमित माहिती मिळते आहे.
१०) फेसबूक: या सामाजिक माध्यमाने तर जगभर क्रांती घडवणारी आंदोलने,उठाव निर्माण करण्यास वापर झाला आहे. मग याला शेती क्षेत्र तरी कसा अपवाद ठरेल. कृषि संबंधी माहिती चर्चीले जाणारे अनेक फेसबूक पेजेस आहेत. ज्यावर कृषि संबंधी अनेक बाबींची चर्चा होताना, यशोगाथा शेअर करताना, प्रशोणोत्तर चर्चा करताना दिसतात.या अश्या एकना अनेक तंत्रज्ञान टूल्सचा आलेख देता येईल. 

इंटरनेट व सामाजिक माध्यम आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक बनले आहेत. मोबाइलच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांनी आज जगभरात क्रांती घडवली आहे. या सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलंय. कुठल्याही क्षणी, कुठल्याही गोष्टीवर आणि आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपले मत व्यक्त करण्याच स्वातंत्र्य सोशल मीडियानं आपल्याला दिलं आहे. चांगल्या गोष्टी, विनोद, आपले आनंदाचे क्षण, आपल्या मनातील भावना सहज दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यात त्यांनाही सहभागी करून घेण्यासाठी हे सोशल मीडियाचं व्यासपीठ चांगलं आहे. या माध्यमांचा वापर करून प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा अगदी जवळच्या आणि सातासमुद्र पार असणाऱ्या आपल्या मित्राशी, मैत्रिणीशी,  नातेवाईकांशी, सहकाऱ्यांशी  सामाजिक माध्यमांच्या मदतीने बोलता येते. जगभरात सामाजिक माध्यमांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
फेसबुक, ट्वीटर, व्हाट्सअप, किवा स्वतःचा ब्लॉग या सामाजिक माध्यमांचा वापर करून आज जगातील करोडो लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपण समाजाच्या संपर्कात राहू शकतो. कधीही, कुठेही कितीही लांब असून सुद्धा एकमेकांच्या संपर्कात राहता येते त्याचबरोबर समाजात घडणाऱ्या घडामोडी काही सेकॅंदाच्या आत आपल्याला कळतात व त्यावर आपली प्रतिक्रियाही नोंदविता येते हे याचे फायदे आहेत.  त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ज्ञान मिळवणे सोपे झाले. आता तरुणांपासून ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. सोशल मीडिया हे नक्कीच सर्वात दर्जेदार शस्त्र आहे पण त्याचा शासकीय पातळीवरही कृषि विस्तार क्षेत्रात वापर करायला हवा.
कृषी संशोधन आणि योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत रुजवण्याचं काम, नवीन माध्यमं (ICT Tools) अतिशय प्रभावीपणे करू शकतात. मल्टीमीडिया, कम्युनिकेशन क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमाच्या या युगात शेतीविषयक माहिती, संशोधन, तंत्रज्ञान, इनॉव्हेटिव्ह प्रयोग ग्रासरूट लेव्हलपर्यंत प्रभावीपणं पोहोचवण्यासाठी अजूनही प्रचंड स्कोप आहे. या कामामध्ये नवीन माध्यम वेब चॅनल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आगामी काळात कृषी विस्तार, आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये व शेतकऱ्यांमध्ये नवीन संशोधन रुजवण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (आय.टी.) वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळंच शेती आणि ग्रामीण क्षेत्रात नवनवीन माध्यमं जोमानं पुढं येत आहेत. आजच्या युगात इन्फॉर्मेशन ही `पॉवर` आहे. यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून ज्ञानकेंद्रित समाज निर्माण होतो. अण्ड्रोइड मोबाइल हे गावागावात पोचलेल साधन झाल आहे. माझ्या महितीतील एका गावचा गुरेराखी ( जनावरे सांभाळणारा) सुधा अण्ड्रोइड मोबाइल वापरतो, व्हाटसएप्प,फेसबूक वर चॅट करतो. असे एकना अनेकजन आता दिसत आहेत. अतिशय ढोबळमनाने पकडली तरीही महाराष्ट्रा साठी हा आकडा सहा लाखाहून अधिक आहे. महाराष्ट्रची एकूण लोकसंख्या ११ कोटी यातील ५५% लोकसंख्या शेतीवर अवलंबून असणारी म्हणजे जवळपास सहा कोटी लोकसंख्या शेतकर्‍यांची आहे. यातली ५०% तरुण म्हणजे ३कोटी तरुण शेतकरी आहेत. याच्या किमान २% जरी अण्ड्रोइड वापरकर्ते पकडले तरी हा आकडा ६ लाखांचा मिळतो. प्रत्यक्षात याहून खूप मोठा आकडा आहे आणि पुडच्या २ वर्षात हा आकडा १० पट वाढणार आहे. 
Entrepreneur dot com च्या एका सर्वे अनुसार २०१७ पर्यन्त एप्प्लीकेशन डेवलपमेंट मार्केट सतेहत्तरशे कोटीहून अधिकचा व्यवसाय क्षेत्र असेल. याच्या १०% जरी एप्लीकेशन कृषि संबंधी असल्या तरी तो खरेच खूप मोठा बदल कृषि विस्तार क्षेत्रात अनू शकेल.
शेतीच्या निविष्ठा ऑनलाइन खरेदी, कृषि उत्पादन तंत्रासाठी एका तज्ञाशी अनेकजन सहज जोडणे,उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे तंत्र प्रसारित करणे, थेट माल-थेट भाजीपाला उत्पादक ते ग्राहक पोचवणे, हे सर्व आणि असे बरेच काही अल्पखर्चीक, सहज शेतकर्‍यांना उपलब्ध होवू शकेल. 
गावच्या सार्वजनिक चौकात,ओट्यावर आजही गप्पा रंगतात. या गप्पांमध्ये एका अण्ड्रोइड वापरणार्‍याने आसपासच्या १० जणांना जरी ही तंत्र चर्चा केली तरी सुधा हा बदल शेती,समाज व्यवस्थेला पुढच्या टप्प्यावर नेवू शकेल.गरज आहे ती धोरणकर्त्यांनी या कडे लक्ष देण्याची व सर्वकश प्रयत्न करण्याची.

-इरफान शेख, केज,बीड ०९०२१४४०२८२
(लोकछत्र या दिवाळी अंक २०१५ मधील माझा लेख)

Tuesday, November 24, 2015

हिरवी मिरची

जमीन 

पाण्‍याचा उत्तम निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पिक चांगले येते. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

लागवड
खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.


** वाण
पुसा ज्‍वाला -
ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

पंत सी – 
हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

संकेश्‍वरी 32 – 
या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.
मुसाळवाडी – 
या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पुसा सदाबहार – 
या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडी योग्‍य आहेत.

** बियाणाचे प्रमाण
हेक्‍टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.


** पूर्वमशागत
एप्रिल मे महिन्‍यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्‍टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.


** लागवड
जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले  जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.


बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यामध्‍ये 10 टक्‍के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्‍यावे. त्‍यानंतर या ओळीमध्‍ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे.  बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्‍के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 80 टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

** खत व्‍यवस्‍थापन
वेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.


** पाणी व्‍यवस्‍थापन
मिरची बागायती पिकाला जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.  प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्‍याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे. त्‍यानंतर 5 दिवसांच्‍या किंवा एक आठवडयाच्‍या अंतराने पाणी दयावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने   पिकाला पाणी दयावे.


** आंतरमशागत
मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना माीची भर दयावी. बागायती पिकांच्‍या बाबतीत रोपांच्‍या लागवडीनंतर 2 महिन्‍यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.


** रोग व्यवस्थापन
मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.


फळे कुजणे आणि फांद्या वाळणे (फ्रूट रॉट अँड डायबॅक/ ऍन्थ्रॅक्‍नोज)
* कारण - हा रोग कॉलेक्‍टोट्रिकम कॅपसिसी या बुरशीमुळे होतो. सकाळी धुके व दव पडत असलेल्या ठिकाणी दमट वातावरण राहते. अशा ठिकाणी बुरशींचे बिजाणू वेगाने वाढतात.
* लक्षणे - या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट काळी कडा असलेले डाग दिसतात. फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे सुकतात, कुजतात आणि गळून पडतात. (Like our page - www.fb.com/agriindia) बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात, तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात.
* प्रसार - या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो.
* नियंत्रण - हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा.
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिमची ३ ग्रॅमप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून नष्ट कराव्यात.
- रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड (५० टक्के डब्ल्यू.पी.) किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यू.पी.) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (Message by MAZISHETI FOUNDATION) आवश्‍यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांनी सल्ल्यानुसार घ्यावी.


२) भुरी (पावडरी मिल्ड्यू)
* कारण - हा रोग लव्हेलुला टावरिका या बुरशीमुळे होतो.
* लक्षणे - साधारणतः मिरची पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान दिसून येतो. या रोगामुळे पानाच्या खालील बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती पानाच्या पृष्ठभागावर पसरते. याची सुरवात जुन्या पानापासून होते. रोगाचे प्रमाण वाढल्यास पाने पिवळी होऊन गळून पडतात. प्रादुर्भाव वाढल्यास फुलांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो.
* प्रसार - या रोगाचा प्रसार हवेद्वारे व रोगट पालापाचोळ्यातून होतो.
* नियंत्रण
- रोगट पालापाचोळ्यावर रोगाच्या बुरशीचे बिजाणू असतात. शेतातील जुने पीक अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
- रोगाची लक्षणे दिसताच, गंधक (८० टक्के डब्ल्यू.पी.) ३० ग्रॅम किंवा डिनोकॅप (४८ टक्के ई.सी.) १० ग्रॅम किंवा ट्रायडेमाॅर्फ १० मिली किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) ५ मि.लि. किंवा मायक्लोब्युटॅनील १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी ८ ते १० दिवसांनी बुरशीनाशक बदलून घ्यावी.


** किड व्यवस्थापन
फूलकिडे : हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.


विषाणूजन्य रोग
१) चुरडा-मुरडा (बोकड्या) -
कारण - हा रोग टोबॅको लिफकर्ल व्हायरस या विषाणूमुळे होतो.
* प्रसार - या विषाणूचा प्रसार पांढरी माशीमार्फत होतो.
* लक्षणे - या रोगामुळे पाने बारीक, वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पाने मध्य शिरेकडे मुरडतात. पानांच्या शिरा सुजून जाड होतात. पानाचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर, निस्तेज होऊन झाडाची वाढ खुंटते.

२) मोझॅक -
* कारण - हा रोग काकडी मोझॅक विषाणू, बटाटा विषाणू व तंबाखू मोझॅक विषाणू या विषाणूमुळे होतो.
* प्रसार - या विषाणूचा प्रसार मावा किडीमार्फत होतो.
* लक्षणे - या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. पाने बारीक राहून त्यामध्ये हिरवट - पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले-फळे फार कमी प्रमाणात लागतात.

** विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन -
- विषाणू रोगाचा प्रादुर्भाव हा पांढरी माशी, मावा या रसशोषण करणाऱ्या किडींद्वारे किंवा बियाण्यामार्फत होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
- या रोगाचा प्रादुर्भाव रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड जाते. म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर आणि रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत किडींचा प्रादुर्भाव टाळण्यावर लक्ष द्यावे.
- रोगट झाडे दिसताच ती उपटून योग्य प्रकारे नायनाट करावा.
- शेतातील तणे नष्ट करावीत.
- पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट २५ ग्रॅम प्रति ३ x १ मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.
- रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर ४० मेश नायलॉन नेट २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे टाकावे. त्यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
- रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ ई.सी.) ४ मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे तयार केलेल्या द्रावणामध्ये रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.
- पिवळे चिकट सापळे १२ प्रतिहेक्‍टर वापरावेत.
- मिरची पिकाच्या चहूबाजूला २-३ ओळी मका किंवा ज्वारीच्या पेराव्यात.
- लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने डायमेथोएट (३० टक्के ई.सी.) १० मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.डी.जी.) २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५० टक्के एस.सी.) १० ग्रॅम किंवा ॲसीफेट (७५ टक्के एसपी) १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (४० टक्के ई.सी.) २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून फवारणी घ्यावी.
- दोन फवारण्यांमध्ये कडुनिंबावर आधारित ॲझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- यानंतरही रोग नियंत्रणात येत नसल्यास, सायॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) १८ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.


** काढणी व उत्‍पादन
हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्‍यसा फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.
जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी 80 ते 100 क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन 6 ते 7 क्विंटल येते.

Monday, November 23, 2015

ट्रॅक्टर व्यवस्थित तर शेती व्यवस्थित आणि शेती व्यवस्थित तर शेतकरी व्यवस्थित....

माझीशेती : ट्रॅक्टर काळजी (151123)
(पुढील शृंखला -  मिरची)

ट्रॅक्टर व्यवस्थित तर शेती व्यवस्थित आणि शेती व्यवस्थित तर शेतकरी व्यवस्थित....

प्रा. डी. डी. टेकाळे
स्रोत - ऍग्रोवन

** दैनंदिन वापरातील ट्रॅक्‍टरची निगा घेण्यात होणाऱ्या चुका -
- इंजिन ऑइल, रेडिएटरमधील पाणी, इंजिनाच्या टाकीतील तेल आणि एअर क्‍लिनरमधील तेल यांची पूर्तता न करणे.
- ट्रॅक्‍टरला ग्रीस करताना एखादी जागा हुकने.
- बॅटरीतील पाण्याची लेव्हल न करणे.
- सर्व नट-बोल्ट टाईट न करणे.
- दररोज ट्रॅक्‍टर सुरू करण्याआधी लिकेज तपासणी न करणे.
- टायरमध्ये हवेचा दाब कमी असणे.

** ट्रॅक्‍टर वापरात नसताना निगा घेण्यात होणाऱ्या चुका -
- निगा राखण्यासाठी नेहमीची वंगणाची पूर्तता करून न ठेवणे.
- टायरमध्ये हवा भरून न ठेवणे अगर जॅक किंवा ठोकळे न लावणे.
- रेडिएटरमधील पाणी काढून न ठेवणे.
- बॅटरी ट्रॅक्‍टरला जोडून ठेवणे.

** ट्रॅक्‍टरचा अपघात होण्याची कारणे -
- बेजबाबदारपणे ट्रॅक्‍टरचा वापर केल्यास होणाऱ्या सामान्य चुका अपघातास कारणीभूत ठरतात.
- ड्रायव्हर शिवाय इंजिन चालू करणे.
- ट्रॅक्‍टर सुरू असताना त्यावर चढण्याचा अगर उतरण्याचा प्रयत्न करणे.
- ट्रॅक्‍टरजवळ धूम्रपान करणे.
- मशाल किंवा मेणबत्ती जवळ नेऊन बॅटरीतील पाण्याची पातळी पाहणे.
- ट्रॅक्‍टरचे इंजिन चालू असताना ट्रॅक्‍टरखाली काम करणे.
- इंजिन फारच गरम असताना रेडिएटरचे झाकण उघडणे.
- ट्रॅक्‍टर शेडच्या किंवा गॅरेजच्या बाहेर काढत असताना ट्रॅक्‍टर व ट्रॉलीच्या जवळपास लहान मुले किंवा इतर कोणी नाही याची खात्री न करणे किंवा हॉर्न न देणे.

** अवजारे जोडताना आणि वापरताना होणाऱ्या चुका -
- ट्रॅक्‍टरच्या मागे जोडली जाणारी अवजारे ट्रॅक्टरच्या क्षमतेनुसार योग्य जोडावीत.
- ट्रॅक्‍टरमागचे अवजार उचलून वाहून नेताना त्यावर वजनाला जड वस्तू ठेवून वाहून नेऊ नये त्यामुळे ट्रॅक्‍टरच्या हायड्रॉलिक यंत्रणेवर ताण पडतो व ती निकामी होण्याचा संभव असतो.
- ट्रॅक्‍टरची शेतात वापरली जाणारी औजारे वळण आल्यावर उचलावे ते न उचलता वळण घेऊ नये.
- काही वजनी अवजाराकडून काम करायचे असल्यास पुढच्या चाकावर आवश्‍यक तेवढीच वजने लावावीत.
- मळणी यंत्र, चाफकटर, पंप यासारखी यंत्रे चालवताना ट्रॅक्‍टर समपातळीत उभा करावा. ट्रॅक्‍टरचे दोन्ही ब्रेक लावलेले असावेत.

** ट्रॅक्‍टर चालविताना होणाऱ्या संभाव्य चुका -
- ट्रॅक्‍टरची साधारण माहिती असणे, तो मागे-पुढे चालविणे आणि गिअर बदलता येणे म्हणजे ट्रॅक्‍टर चालविता येतोच असे नाही. हे तज्ञाचे काम आहे.
- कामाचा प्रकार पाहून ट्रॅक्‍टरच्या गिअरचा वापर करावा. तिसऱ्या गिअरमध्ये ट्रॅक्‍टर चालविल्यास ट्रॅक्‍टरचे नुकसान होते. जड कामासाठी किंवा ज्या कामासाठी जास्त शक्तीची आवश्‍यकता असते तेथे ट्रॅक्‍टर कमी वेगात चालवावा.
- रस्त्याच्या चढणीवर किंवा उतरणीवर नेहमी (low) लो गिअर निवडावा. तसे न केल्यास अनुक्रमे ट्रॅक्‍टर शक्ती मर्यादेवर व ट्रॅक्‍टरच्या भागांवर अनिश्‍चित ताण पडतो.
- खाचखळग्यांच्या रस्त्यावर वेगात ट्रॅक्‍टर चालवू नये. अशा वेळी ट्रॅक्‍टर कमी वेगात चालविल्यास यंत्रास कमी धक्के बसतात. ट्रॅक्‍टरचे पार्ट ढिले होत नाहीत. चालकास जास्त त्रास होत नाही.
- मागचे एखादे चाक जागेवरच फिरते त्या वेळी डिफरन्शल लॉकचा वापर केला जातो. पण ही अडचण दूर झाल्यावर त्याचा आपणास उपयोग नसतो. पण बऱ्याच वेळा डिफरन्शल लॉकचे लिव्हर सरकवण्याचे विसरून आपण ट्रॅक्‍टरला वळविण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी ट्रॅक्‍टरमधील गियरचे नुकसान होते.

** अज्ञानामुळे होणाऱ्या चुका -
1) ट्रॅक्‍टरच्या फॅन बेल्टचा ताण, बॅटरीचे कनेक्‍शन, इंजिन ऑइल बदलणे, फिल्टर स्वच्छ करणे, फिल्टर बदलणे, सायलेन्सर साफ करणे वगैरे विषयीचे बेसिक ज्ञान असावे लागते.
2) नोझलच्या दाबाची व इंजेक्‍टरची तपासणी व्हॉल्व्ह स्प्रिंग आणि टायपेटचे अंतर पाहणे, मागील चाकातील बेअरिंग स्वच्छ करणे, मेन बेअरिंग व कनेक्‍टिंग रॉड बेअरिंग बदलणे ही कामे तज्ञ मेकॅनिककडून करून घ्यावीत.
3) ट्रॅक्‍टरव्दारे व्यवस्थीत काम होण्यासाठी वेळच्यावेळी ट्रॅक्‍टर मेकॅनिककडून तपासून घ्यावा.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Thursday, November 19, 2015

कांदा लागवड

जमीन 
मध्यम ते साधारण कसदार व पाण्याचा निचरा होणारी जमीन कांद्याला चांगली मानवते. मध्यम प्रतीच्या रेतीमिश्रित जमिनीत कांदा चांगला पोसतो. मुळाभोवती भरपूर ओलावा राखून कांद्याच्या संपूर्ण वाढीला वाव देणारी भुसभुशीत जमीन कांद्यासाठी उपयोगी असते. जमिनीचा पी.एच. (सामू) 6.5 ते 7.5 असल्यास कांदा चांगला वाढतो. भारी चिकण मातीच्या जमिनीत कांद्याची वाढ होत नाही.


लागवडीची वेळ 
रोपवाटिका तयार करणे 
बियाण्याची उगवणशक्ती चांगली असल्यास हेक्‍टरी आठ किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्याला शिफारशीत ताम्रयुक्त बुरशीनाशक दोन ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे चोळून घ्यावे. रोपवाटिकेत तणांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी रोपवाटिकेची जागा नांगरून, भिजवून, पॉलिथिन कागदाने 10-12 दिवस झाकून निर्जंतुक करून घ्यावी. दर 100 चौ.मी.ला 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हीरीडी बुरशीचे मिश्रण 1250 ग्रॅम कुजलेल्या शेणखतात मिसळून रोपवाटिकेच्या जागेत मिसळावे. जमीन चांगली भुसभुशीत करून त्यात शेणखत व नत्रयुक्त खत चांगल्याप्रकारे मिसळावे. एक हेक्‍टर लागवडीसाठी अंदाजे 10 आर क्षेत्रावर रोपवाटिका करावी. बियाणे पेरणीपूर्वी रोपवाटिकेत पाच गाड्या कुजलेले शेणखत, अडीच किलो नत्र आणि पाच किलो स्फुरद द्यावे. पेरणीसाठी 3 मी. x 1 मी. आकाराचे गादी वाफे करावेत. पेरणी करताना ओळीमध्ये पाच सें.मी. अंतर ठेवून दोन सें.मी. खोलीवर करावी. बियाणे फार दाट पेरू नये म्हणजे रोपांची वाढ सारखी होऊन रोपवाटिकेची देखभाल सुलभतेने करता येते. रोपवाटिकेमध्ये मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तीन आठवड्यांनी 2.5 किलो नत्र द्यावे. पुनर्लागवडीच्या आधी आठ दिवस हळूहळू पाणी तोडावे म्हणजे रोप काटक बनते, पुनर्लागवडीत टिकाव धरते. रोपे उपटताना मुळे तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोप उपटण्यापूर्वी 24 तास आधी वाफ्यांना चांगले पाणी द्यावे.


लागवडीचे तंत्र - 
नांगरणी व कुळवणी करून जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेत तयार करताना चांगले कुजलेले शेणखत हेक्‍टरी 20 टन याप्रमाणे शेतात मिसळावे. कांद्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी-वरंब्यावर करता येते.

साधारणतः दोन मीटर रुंद व तीन मीटर लांब आकाराचे वाफे सोईस्कर असतात. 
पुनर्लागवडीसाठी रोपवाटिकेतून जोमदार, सारख्या वाढीची निरोगी रोपे निवडून घ्यावीत. रोप लागवडीपूर्वी त्याची मुळे पाच मिनिटे ऍझोटोबॅक्‍टरच्या द्रावणात (पाच लिटर पाणी + 250 ग्रॅम जिवाणू खत) बुडवावीत, त्याचा रोपवाढीवर आणि कांद्याच्या उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी 12 x 7.5 सें.मी. अंतरावर दोन ते तीन सें.मी. खोलीवर ओळीत प्रत्येक ठिकाणी एक रोप लावावे. पुनर्लागवडीनंतर त्वरित हलके पाणी द्यावे. सरी पद्धतीने लागवड करताना दोन सऱ्यांमधील अंतर 30 ते 45 सें.मी. ठेवून सरीच्या दोन्ही बाजूंस लागवड करावी. वाफ्यांमध्ये पाणी साचून राहिल्यास कांद्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिमच्या द्रावणात बुडवावीत. हे द्रावण तयार करण्यासाठी एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळावे.


खत व्यवस्थापन 
माती परीक्षणानुसार कांदा पिकाला रासायनिक खते द्यावीत. कांद्याचे पीक सेंद्रिय खते व नत्रयुक्त खते यांना चांगला प्रतिसाद देते. जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी हेक्‍टरी 20 टन शेणखत, कंपोस्ट द्यावे; तसेच हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. संपूर्ण स्फुरद व पालाश आणि निम्मे नत्र लावणीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांच्या आत द्यावा. खतमात्रा उशिरा (पातीच्या वाढीच्या काळात) दिल्यास पातीची जोमदार वाढ होऊन कांदे नीट पोसत नाहीत, जाड मानेचे होतात, तसेच त्यात जोडकांद्याचे प्रमाण अधिक वाढते. हे कांदे साठवणुकीसाठी निरुपयोगी असतात.


सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर - 
1) पिकाच्या निरोगी वाढीसाठी तांबे, झिंक, बोरॉन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात, त्यामुळे कांद्याची प्रत सुधारते आणि असे कांदे साठवणीत चांगल्या स्थितीत टिकून राहतात. माती परीक्षणानुसार हेक्‍टरी 125 ते 155 किलो कॉपर सल्फेट लागवडीच्यावेळी मिसळल्यास कांदे घट्ट होतात, त्यांचा रंग आकर्षक व चमकदार दिसतो. उत्पादनवाढीस मदत होते. 
2) बोरॉनच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते व पातीचा रंग करडा- निळसर पडतो, कांद्याची पात कडक आणि ठिसूळ बनते. शिफारशीनुसार बोरॅक्‍सची फवारणी करावी. 
3) झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडल्यास पाने जाड होणे, खालच्या अंगाने वाकणे ही लक्षणे दिसतात. दोन मि.लि. झिंक सल्फेट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास यावर नियंत्रण मिळते. सेंद्रिय खतांचा (शेणखत, लेंडीखत) चांगला पुरवठा असल्यास सर्वसाधारण जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही.


पीक व्यवस्थापन -
कांद्याच्या पिकाला नियमित पाणीपुरवठा महत्त्वाचा असतो. कांद्याची मुळे जमिनीच्या वरच्या थरात म्हणजे बहुतेक आठ सें.मी. खोलीपर्यंत पसरलेली असतात. यामुळे पिकाला पाणी देताना 15 सें.मी.पेक्षा जास्त खोलवर जाईल असे पाणी देण्याची गरज नाही. कांदा पोसायला लागल्यावर पाण्याचा ताण देऊ नये, कारण या काळात पाण्याचा खंड पडल्यास पाणी पुन्हा सुरू केल्यावर वाढीला लागलेल्या कांद्यात जोडकांद्याचे प्रमाण वाढते. तसेच, कांद्याच्या वरच्या पापुद्य्राला तडा जातो. लागवडीनंतर कांद्याला लगेच पाणी द्यावे. त्यानंतर 12 ते 15 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. नंतर जमिनीचा मगदूर आणि हवामान लक्षात घेऊन 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. कांद्याला तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतीनेही पाणी देता येते. 
लागवडीनंतर खुरपणी व निंदणी करून तण काढून टाकावे. पहिली खुरपणी एक ते दीड महिन्याने आणि दुसरी त्यानंतर एक महिन्याने करावी. खुरपणीच्या वेळी वरखताचा हप्ता द्यावा आणि लगेच पाणी द्यावे.


कांदावरील महत्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण
तपकिरी करपा-
◆ हा बुरशीजन्य रोग असून, प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांवर पिवळसर, तपकिरी रंगाचे लांबट चट्टे बाहेरच्या बाजूला दिसतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकतात.
◆ फुलांचे दांडे मऊ होऊन वाळून    मोडतात.
नियंत्रण-
◆ दर १० ते १५ दिवसांच्या अंतराने ०.२% कार्बेण्डझिमची फवारणी करावी किंवा ३ ग्रॅम मॅकॉझेब प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टटचा वापर करावा.

जांभळा करपा-
◆ हा बुरशीजन्य रोग पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत येतो. पानावर सुरुवातीस खोलगट, लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्ट्यांचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो.
◆ चट्टे पान किंवा फुलांच्या दांड्यावर दिसतात. चट्टे वाढून एकमेकात मिसळून पाने करपून वळतात.
नियंत्रण-
◆ ३० ग्रॅम मॅकोझेब किंवा २० ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा २० ग्रॅम क्लोरोथलोनील प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने आलटून-पालटून फवारणी करावी. द्रावणात सर्फेक्टटचा वापर करावा.

Sunday, November 15, 2015

माझीशेती : उत्तम व्यावसायिक शेतकरी व्हायचे आहे???

माझीशेती : उत्तम व्यावसायिक शेतकरी व्हायचे आहे???

मग हे करा.
१)  सर्वांचे ऐकायला शिका.
२)  अनुभवाची शेती करायला शिका.
३)  उत्पादन खर्च कमी करा.
४)  इतरांचे अनुभव वापरताना शास्त्राचा आधार घ्या.
५)  यशस्वी शेतकऱ्यांच्या संपर्कात रहा.
६) चांगले व यशस्वी विचार देवान-घेवाणीसाठी किमान 7 दिवसातून एकदा एकत्र येवून चर्चा करा.
७) जिथे शंका वाटेल तिथे सल्ला मसलत करा.
८) "शेजाऱ्याने केले म्हणून" ही प्रथा बंद करा.
९) उपलब्ध संसाधने ओळखून त्यांचा पुरेपूर वापर करा.
१०) पुढील 8 दिवसांचे आणि हंगामाचे स्वतंत्र नियोजन बनवा.
११) शक्य तिथे आंतरपीके किंवा लाखी बागेचे प्रयोग करा.

यासाठी संस्थेकडून स्वतंत्र कार्यशाळा घेतली जाते. आपले मागणीनुसार आणि गरजेनुसार तुमच्यासाठी कार्यशाळेचे नियोजन केले जाते. अधिक माहितीसाठी ९९७५७४०४४४ (MAHESHJI BORGE) यांचेशी संपर्क करा.

(जास्तीत जास्त शेतकरी या चळवळीत सामावून घ्या. त्यांच्या मोबाईल वरुन खालील प्रमाणे whats app मेसेज करायला सांगा)

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444

Sunday, October 25, 2015

राज्यात भागिदारी तत्वावर आठ कृषी प्रकल्प होणार...

राज्यात भागिदारी तत्वावर आठ कृषी प्रकल्प  होणार... (20151025)
सौजन्य - आरएमएल

राज्यात शेतकरी, शासन आणि खासगी कंपन्यांच्या भागिदारीतून आठ प्रकल्पांचे आराखडे तयार करण्यात शासनाला यश आले आहे. या प्रकल्पांना एकूण साडे अठरा कोटी रुपयांचे सरकारी अनुदान मिळत आहे.

कृषी विभागाच्या सूत्रांनी ‘आरएमएल’शी बोलतांना ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये शेतक-यांकडून 18 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सार्वजनिक आणि खासगी भागिदारी तत्वावर या प्रकल्पांची उभारणी केली जाईल.

मुख्य म्हणजे राज्यातील एक लाख 40 हजार शेतक-यांचा 3 लाख 28 हजार टन शेतमाल खरेदी करण्यासाठी या प्रकल्पांची आखणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शेतमालाचे उत्पादन ते विक्री व्यवस्था अशी संपूर्ण साखळी या प्रकल्पांमधून हाताळण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. हिरवा वाटाणा, मधुमका,भाजीपाला,गुळ,कापूस,कडधान्य आणि सोयबीन अशा पिकांसाठी सदर प्रकल्प तयार होत आहेत.

या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

बुलढाणा,अहमदनगरमध्ये हिरवा वाटाणा प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठी त्रिमूर्ती फुडटेक प्रा.लि आणि एडव्हान्ट लिमिटेड कंपनी पुढे आली आहे. याच कंपन्या अहमदनगर आणि औरंगाबादला मधुमका प्रकल्प उभारणार आहेत.

आकाश एग्रो सोल्युशन प्रा.लि. ही कंपनी जालना,औरंगाबाद, जळगावमध्ये भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. श्रीकांत एग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनी व ग्लोबल एपेक्स एक्झिम  कंपनी सातारा, सांगलीत गुळ प्रकल्प उभारत आहे.

यवतमाळच्या कापूस प्रकल्पात एफएफपीआरओ व दयाल कॉटन लिमिटेड कंपनी सहभागी होत आहे. अकोल्याच्या कापूस यांत्रिकीकरण प्रकल्पात जॉन डिअर कंपनीने देखील प्रस्ताव दिला आहे. उस्मानाबाद, लातूर, बीडसाठी कडधान्य प्रकल्पाकरीता रॅलीज इंडिया कंपनी पुढे आली आहे. 

सोयबीन प्रकल्पासाठी उस्मानाबाद,लातूर, बीड,बुलढाणा,अकोला, वाशीम,अमरावती तसेच नागपूरची निवड झाली आहे. एडीएम एग्रो इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीमार्फत सोयबीन प्रकल्प तयार होतील.

माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान :
चळवळ - नाविन्यपुर्ण शेतीची
-----------------------------------
** शेतीच्या बातम्या व इतर अपडेट्स करिता <नाव_गट नं_संपुर्ण पत्ता_जिल्हा_राज्य_मोबाईल नंबर> आम्हाला 09975740444 या नं.वर कळवा.
-----------------------------------
विभागीय कार्यालय - सांगली, रायगड, औरंगाबाद, अकोला, नाशिक, चंद्रपुर
६४७, दसरा चौक, सावळज, जि. सांगली (४१६३११) महाराष्ट्र
www.mazisheti.org
www.fb.com/agriindia
Whatsapp - 9975740444