Saturday, May 27, 2017

शेतकऱ्यांना दिलासा देणारी माझीशेती गट संकल्पना

शेतकऱ्यांना दिलासा देणारी माझीशेती गट संकल्पना
लेखक आणि संकल्पना - महेश बोरगे

सहभाग -
धना - धनंजय उरणे
सगु तात्या - सागर कदम
अप्पा - अक्षय मोरे
सुरज भैय्या - सुरज मोरे

नमस्कार मंडळी,

आपल्या नेहमीच्या पारावरच्या गप्पा नेहमीच चालू असतात. सगळ्यांचा पहिला गहन विषय असतो अच्छे दिन आणि दुसरा गहन विषय कर्जमाफी.... या दोन विषयांना घेतल्याशिवाय कारभारणींन थापलेली भाकर गळ्यातन उतरतच नाई. आधीमधी कधीकधी IPL आणि कबड्डी बी असती पर काय बी म्हणा अच्छे दिनाच्या गाजराच्या पुंगीपुढं कर्जमाफीची नागीण डुलल्या शिवाय मज्जा नाय.... जश्या तुम्ही पाराव बसुन गप्पा हणता तसल्या आमी बी हाणतो.... काल बी मी, धना, सगु तात्या, सुरज भैय्या .... आणि लयं मोठा चर्चेचा विषय निघाला की आपलं चुकतंय कुठं... बघा, पाराव बसलुया आणि विषय हुता आपलं गणित चुकतंय कुठं आणि करायचं काय.

धना : लेकाणू कायतर कराया पायजी....
सगु तात्या : व्हय व्हय काय तर झालंच पायजे...
सूरज भय्या : गपा रं, कायतर कराया पायजी....राच्याला पाण्यावर कोण जाणार हाय... कोण नसलं तर ही पाळी मला पायजे, गेल्या बारीला लायट नव्हती तवा मला पाणी नाय भेटलं.
आप्पा : ये लयं शहाणं हु नकु म्या पाणी पाजायला चाललुय, ही घोंगडी इथं झोपाया आणि काठी कायं कुत्री माराय आणली व्हय...
सूरज भैय्या : आप्पा का तापतुया, तुझं झाल्याव मला उठीव.. मी येतो सोबतीला आणि पडतुकी बांधावर. तुला बी सोबती हुईल...
आप्पा: व्हय व्हय चल लेका, पर्वा नायका पाटलाचा बाळ्या जनावर लागून मेलं, मला तर लयं भ्या वाटतंय पर लेकाणू पोरांच्या तोंडाकडं बघवना रं
धना : आर चांगलं हाय की, रोज मरण्यापरास जनावर लागून एकदाचं संपल्याल बर...
सगु तात्या: मला तर काय बी कळणं बंद झालंय, डोक्याला शॉट लागलाय नुसता...
.
.
(भयाण शांतता)
.
.
आप्पा : हुंय रं
.
.
आपा : आर ये, काय मयताला आला कारं, समदी अशी जीव गेल्यागत बसून हाय. धन्या लेका तू तर ढाण्या वाघ हायस आणि तुला का धाड भरली का?
धना : आप्पा तूच सांग, काय करू दी... पोरीची बारावी झालीया.
सूरज भैय्या : आर बाबलीच्या, पोरगी देवाच्या गुणाची हाय आणि तिच्या नावानं का गा डोकं धरलंस..
धना : देवाच्या गुणाची म्हणूनच डोकं फिरलया. आता निकाल लागल्यावर कायं सांगू तेच कळणं बंद झालयं बघ. रोज रात्री उशिरापर्यंत इथंच पाराव बस्तु आणि पोरं झोपली की घरला जातूय बघ. पुढं शाळेला शहरात जायचं म्हणतीय, तुला तर माहिती हाय, पाणी हाय तर लायट नाय आणि लायट असली तर पाणी पुरत नाय... त्यातनं बी काय पान लागलंच तरी पुढं दर मिळाला पायजी.
.
.
.
आप्पा : (आवंढा गिळत) मी काय म्हणतुय, मोदी कर्ज माफी करतु म्हणलेला तेच काय झालं कळलं का??
सूरज भैय्या : ये आप्पा, पाण्याव चल, त्या मोदीच्या नादाला नग लागू. अजून विधानसभा निवडणूक लांब हाय, तवा करील कर्ज माफी... काम धंदा सोडायचा आणि अच्छे दिन आणि कर्ज माफी करत बसायचं, चल बिगी बिगी... बांधावर एक डुलकी तर काढीन.
धना: खरंय भैया, नायतर हे काँग्रेस वाले काय आणि भाजपा वाले काय. आपल्या माग का लागत्यात माहिती का तुमास्नी...
सगु तात्या : अयं, ही बघा तत्वज्ञ.... आता समद्यानी ऐका, संत महाराज धनाजी राजे आपल्यासणी या पाराच्या साक्षीनं निरशी कथा सांगत्यात...
.
.
(सगळेच दिलखुलास हसतात)
.
.
धना : अय ऐकून घी पयला मग बोंबाल माझ्या नावानी...
सगु तात्या : धना मी काय वंगाळ बोल्लू व्हय... चांगलं म्हणलं तरी बी नेहमी आपलं मलाच बोलायचं
धना : मी काय म्हणतुय ते तर ऐक, मग बोल की काय बोलायचं ती...
.
.
बघा.. तुम्ही रोज पेपर वाचता का नाय... समदी शेतकऱ्यांना काय ना काय द्येत्यात का नाय... असा कधी पेपर निघतु का त्यात आपल्यातल्या कुणी जीवच दिला नाय...
आप्पा : तुला काय म्हणायचंय
धना : आप्पा बघा, माझ्या पोरीला आता घरात ठेवायचं तर पंच्याती आणि शाळेला धाडायची तरी पंच्याती... मला तिचं हात पिवळं केलं पायज्यात नायतर शाळेला धाडली पायजे.. दोनीबी बाजूला पैका तर पायजेच. अनं तुला तर मायतीच हाय, माझी सोसायटी अजून तशीच हाय. . आता म्या पैका आणायचा तर कुठंन गा. माझी तर झोपच उडाल्या बघ.
सगु तात्या : हं, त्यात काय एवढं. हित येत जा पाराव माझ्यापशी. लयं झ्याक झोप लागत्या. मी तर कायमचा इथंच असतुया... निदान तू घरला तर जातूयस.
धना : वरच्या पट्टीला कांदा हुता त्यो पडलाय चाळणीला, आता तिथं काय करावं ते बी सुचणं बंद झालंय. बेण्याचं कायतर हुईल पर खतांचे तू बघतुयास, परत कामाला मजुराचं बी मेळ बशीना...
आप्पा : धना, असं धीर सोडून कसं चालेल, आपुन थांबून चालेल का??? आर आपुन हाय म्हणून आपलं गाव चालतय... काय ना काय काम केले की गावात समद्यासनी रोजंदारी तर मिळत्या. नायतर आपल्यासंग ही बिना जमिनीची माणसं उपाशी मेली असती.
सुरज भैय्या : हे अगदी लाखात एक बोल्लास... आपल्या शिवाजी महाराजांनी सांगितलंय लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पायजे. आर जगाला पोटाला घालणारी जात आपली अन ही काय रडगाणं लावलंयस...
सगु तात्या : तू आता अलंयस शेती करायला. आमची हयात गेली शेतीत. मोबाईलवर शेती होत असती तर म्या इथं झक माराय पाराव पडलू असतु का???
धना : भैय्या तू नक्की काय करतूस र त्या मोबाईल मधी...
सुरज भैया : तुमी कधी माझं ऐकलंय का??? आपली शेती एकदम वंटास हाय, पाणी हाय, पिकतंय बी भारी... फकस्त आपलं विकायचं काय होत नाय. आणि तिथंच आपलं घोड पेंड खातंय... मी गेल्या आठवड्याठाव माझीशेतीच्या ग्रुपला जॉईन झालूया, मला सगळं तिथंच कळतंय.
आप्पा : ये भैया जरा कळलं असं बोल. ती माझीशेती वाली म्या कधी पाह्यली बी नायती आणि ती काय सांगत्याती...
सुरज भैया : ती आपल्यासणी काय बी सांगत नायत, समदं आपल्यापाशीच हाय. ती फक्त दाखवत्यात....
सगु तात्या : धनाच पान भैयाला लागल्याल दिसतंय... तू फेक, त्येच्या मायला सकाळपसन कोण भेटलं नाय हुंय...
सुरज भैया: आता बघ, तुला पेराया येतं का?
सगु तात्या : व्हय.. आयुष्य गेलं की माझं.. आता काय तू शिकवतु का? तुझी ती माझी का तुझी शेती, काय ती...?
सुरज भैया : ते पेराया शिकवत नायती ना काढायला,
सगु तात्या : तुला काढाया बाकी भारी जमतंय, येत जा आमच्याकडं... आमच्या शेतात बी लयं वाढ झालीया...
धना : आर मग ती माझीशेतीवाली करत्याती कायं???
सुरज भैया : त्यांनी आपलं ग्रुप केलेत आणि आपल्यालाच आपली काम करायला लावत्याती. आप्पा, गेल्या बारीला मी तुझी कपाशी लावायची दिशा बदलावली काय फरक पडला का त्यानं...
आप्पा : खोट का बोलू, लेका लयं फरक पडला रं...
सगु तात्या : ही बघा, आंधळ्याला भयंर साक्षीला... दिशा बदलून फरक पडला म्हणं.
धना : आर तात्या ऐक तर खरं काय सांगत्याती, आधीच माझं डोसक्याचं भरीत झालंय तू आणि लयं फिरवु नकु. भैय्या बोल तू हेझ काय करायचं म्या बघतू.
सुरज भैय्या : तुला सांगातु धना, आम्ही बघ 70-80 जण हाय, आम्ही कधी भेटलू बी नाय आणि महेश बोरगे तर कधी कुठं काय सांगाय बी जात नाय. आमचं सगळं मोबाईलवर... पीक कुठलं लावायचं, मशागत कशी करायची ही कधी पुस्तकात वाचून आणि कुणी सांगून होत नाय. आजकाल सगळी मोठी तज्ञ झाल्याती.. पर इथं सगळं आपलं आपुन करायचं...
सगु तात्या: आर मग ती करत्याती कायं, उग येड्यावणी कायं तर बरळु नगं...
आप्पा : आर आपली काम आपुन करतच राहायचं, गरज वाटली तर थोडा बदल सांगत्याती. मजी बघ, आतापतुर मी बैलं फिराया सोपं जातंय म्हणून सरळ उभं पेरायचो पण जवा कपाशी फुलावर याची तवा वारं सरळ निघून जायचं यावेळी ग्रुप मध्ये आडवं पेरल्याव होणारं फायदा सांगितला आणि म्या आणि भैय्या न आडवं पेरलं... पेराया जर येळ गेला पर लेका जवळजवळ सगळ्या फुलातनं बोण्ड फुटली की...
धना : काय सांगतूस, भैया खरंय कायं...
सुरज भैय्या : आर धना नुसतं खरं नाय तर सगळीकडे माझीशेतीचे ग्रुप झाल्याती आपुन बी आपल्यासाठी माझी, तुझी आणि समद्यांची शेती मिळून करूया... आपलं ग्रुप करूया. जगाच्या शेतीच परत बघू पर माझीशेती आधी फुलवू...
धना : मग आपण कधी जायचं भेटायला...
सुरज भैया : आर धना, कश्याला कुठं जातूस... माझं पाणी पाजयचं पडलंय.
सगु तात्या : आर मग कश्याला हुलीव घालातूयास.. आमचं आमी करतुय नव्ह शेती, लयं आला माझीशेतीच सांगाय.
सुरज भैया : आर माझीशेती म्हंजीच माझीशेती, स्वतः स्वतःची शेती करत करत इतरांशी गप्पा मारायच्या. शेती करता करता काय प्रश्न पडला तर सरळ ग्रुपवर विचारायचा आणि उत्तर घ्यायचं... तुला काय प्रश्न पडला तर ग्रुपमध्ये विचार मला येत असेल तर मी सांगीन नायतर कोणी ना कोणी तरी सांगिलच की...
धना : मी कुठल्या ग्रुपमध्ये विचारू...
सुरज भैया : तुला व्हाट्स अप वापरायला येत का? फेसबुक माहिती हाय का??? मोबाईल वापरायला येतो का?
सगु तात्या : ही बघा वाडीवन आलं येड आणि भज्याला म्हणतंय पेढ... गावात कोणाची टाप हाय का आमच्यासारखा मोबाईल वापरायची...
धना : भैया, आता तुला वाटतंय का मोबाईल वापराया येत नसल.
सुरज भैया: मग सरळ 9975740444 मेसेज कर आणि ग्रुपला ऍड हो. झालं...
आप्पा : आर मग आपुन रोजच हाय की इथं, जगाच्या उसाभरी काढण्या परीस चार चांगल्या गोष्टी करू.
धना : आपुन एक रोज इथं हाय म्हणून का रोज समदी हायत का? आपल्यामुळे जर चार चौघांचं भलं होत आसलं तर काय वंगाळ हाय का?
सुरज भैया : आपल्याला काय लागणार, किती लागणार हे आपणच ठरवायचं आणि सगळ्यांनी एकत्रच घ्याचं, आपलं चार पैसे वाचलं तर पोरा बाळसनी खायला घ्याला ईल.
धना : कोण कोणाचं नाय बघ.सगळी कास्तकाराच्या जीवावर धंदा कराया बसलीती. आपणच आपलं बघितलं पायजे.
सुरज भैया : आपल्या भारतात सगळ्यात मोठा समाज आपला शेतकरी / कास्तकार समाज आहे. कोणाला आपल्याला दुखवुन काय करायला येतच नाही. येक सांगतो बघा, सगळी गॉड बोलून आपली मार्त्यात, आपण ठरवायला पायजे कोणाला जवळ करायचं आणि कोणाला लांब.. आपण जोवर आपल्या धंद्यासाठी एक होत नाय तोवर सगळे आपल्या मेल्याल्या मयताच लोणी खायाची बंद नाय हुणार...
आप्पा : भैया लेका मला गा कुठं येतूय मोबाईल वापराया...
सुरज भैया: मग आप्पा दर आयतवारी आपुन इथंच पाराव भेटू आणि फक्त शेती, शेतकरी आणि आपल्या गाव-शिवाराची चर्चा करू. आणि जर वाटलंच तर आपण गावासाठी व्यावसायिक शेतीची कार्यशाळा बी घेऊ की... त्यात समजतंय की मोबाईल, कॉम्पुटर, इंटरनेट वापरायला. शासन, विद्यापीठ, इतर संस्था काय सांगत्यात, जगात काय चाललंय ही बघायचं कसं ही समदं माझीशेती शिकवते.
सगु तात्या : ये बाबा, पैशाच काय बी नगु सांगूस. इथं दिसभर पारावर बस म्हंजी तुला कळल कितीजण माहिती देणारे सल्लागार गाड्या घेऊन फिरत्यात.
सुरज भैया : त्याना कश्याला पैसे द्यायचे. आपण आपल्यासाठी गट तयार करायचा, आपण आपल्याकडून आपल्यासाठी पैसे घ्यायचं आणि गरज लागली तर आपल्यासाठी खर्च करायचं. माझीशेती ही शासनाकडून धर्मादाय उपक्रम राबविण्यासाठी नोंदणीकृत संस्था आहे.
सगु तात्या : मग ती काय फुकट करत्याती का?
धना : धर्मादाय कडची संस्था म्हणजे समाजासाठी काम करते. काय भैया बरोबर हाय क नाय.
सुरज भैया : होय धना, असच हाय... इथं पैश्याची लूट अजिबात नाय बघ...
सगु तात्या : आर असं असलं तर मी बी देतू की... चला मग मी जातू माझीशेती मध्ये...
धना : मी बी हाय माझीशेती मध्ये...
आप्पा : भैय्या तुला पाण्याची पाळी पायजी नव्ह, तर चल माझीशेती मध्ये...
.
.
.
(हसत हसत सर्वजण निघून जातात)

Monday, April 24, 2017

मागेल त्याला शेततळे - महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासनाची “मागेल त्याला शेततळे” या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत शेतकरी बांधवांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज कसा भरावा किंवा अर्ज भरण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत वैयक्तिक आणि सामुहिक पद्धतीने अर्ज दाखल करता येऊ शकतो.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट ला भेट द्या.
  • या लिंक वर गेल्यावर तुम्हाला “अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा” असे लिहिलेल्या ठिकाणी क्लिक करा.
  • आपले सरकार प्रोफाईल वरून लॉगीन करा.
  • वयक्तिक किंवा सामुहिक शेततळे हा पर्याय निवडा त्यानंतर अर्ज दाखल करून अॅप्लिकेशन नंबर लिहून ठेवा.
लाभार्थी पात्रता :
  • शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यात कमाल जमीन धारणेची मर्यादा नाही.
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
  • अर्जदाराने यापूर्वी शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भातखाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराला खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला
  • ७/१२ चा उतारा
  • ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र)
  • आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी)
  • दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
  • स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
  • आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)
शेततळ्यासाठी अटी / नियम :
  • कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक असेल.
  • कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
  • लाभार्थींना स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक /कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स सह सदर करावा .
  • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
  • शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी .
  • शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकर्याची राहील
  • पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
  • लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे .
  • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
  • शेततळ्याला इनलेट आउटलेट ची सोय असावी .
  • शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरिकरण अर्जदाराला स्वखर्चाने करावे लागेल.

मागेल त्याला शेततळे योजनेचा अर्ज

मागेल त्याला शेततळे योजना
मागील शासन निर्णय मधील ५० पैसे आणेवारीची अट रद्द करून संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्याचे ठरविले आहे. विस्तृत शासन निर्णय egs.mahaonline.gov.in/PDF/Shetatle.pdf या लिंकवर उपलब्ध आहे. तसेच या योजनेसाठी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे www.mazisheti.org/2017/04/shettale.html या लिंकवर उपलब्ध आहे. ज्यांना online नोंदणी शक्य नाही त्यांनी goo.gl/forms/6JRl9DVIJBDP4Igf2 येथे माहिती भरा आमचेकडून संपर्क केला जाईल.

अर्ज भरण्यासाठी सोबतची माहिती / कागदपत्रे जवळ ठेवा.
१.      आधार कार्ड
२.      प्रवर्ग (अनुसूचित जाती/ जमाती/ मागासवर्गीय / खुला)
३.      BPL यादी क्रमांक
४.      आत्महत्या कुटुंबातील वारस आहात का?
५.      शेततळे घ्यावयाचे क्षेत्र ८अ आणि ७/१२ आणि क्षेत्र
६.      इनलेट-ओउटलेट सह / शिवाय

आकारमान
क्षेत्रफळ
घनता
आकारमान
क्षेत्रफळ
घनता
15x15x3
225
441
25x25x3
625
1461
20x15x3
300
621
30x25x3
750
1791
20x20x3
400
876
30x30x3
900
2196
25x20x3
500
1131




७.      यापूर्वी शेततळे घेतले आहे का?
८.      बँक पासबुक
बँक नाव                                        खाते नं.                                   आयएफएससी कोड


याशिवाय
१.      स्वत :च्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज scan करून पाठवावे .
२.      सामुदायिक शेततळे संबंधित रु.100स्टॅंप पेपरवर करार स्कॅन करून पाठवावे.
३.      7/12 उतारा (पहिला शेतकरी)
४.      8-अ नमुना (पहिला शेतकरी)
५.      आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला.( तलाठी) (पहिला शेतकरी)
६.      दारिद्र रेषेबाबतचा दाखला (ग्रामसेवक) (पहिला शेतकरी)
नोट - सामुदायिक शेततळ्यासाठी शासनाची जी असेल ती देयक अदा करावे लागेल. 


Sunday, March 12, 2017

माझीशेती : स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना उपजीविका विकास करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन

माझीशेती : स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना उपजीविका विकास करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन (170310)
https://youtu.be/gXJQbcCmmec

 खुर्द येथे ग्रामीण भागातील महिला सबलीकरण अंतर्गत सुझलन फाऊंडेशनच्या सामाजिक विकास प्रकल्प अंतर्गत आणि येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हस्तकला व कौशल्ये विकासाचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

स्त्रियांच्या अंगभूत कलागुणांना वाव देऊन त्यांना उपजीविका विकास करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले. सुझलानच्या सामाजिक बांधीलकी निधीतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून Mazisheti Pratishthan कडुन या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंना मार्केट कसे शोधायचे आणि उत्पन्न वाढीसाठी सहकार्य आणि मार्गदर्शन देण्याचे आश्वासन महेश बोरगे यांनी दिले.

यावेळी श्री. सागर खोत यांच्यासोबत घोटी खुर्दच्या मा. सरपंच महोदया, माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे (Mahesh Borge, सावळज), वर्षा मस्के, अश्विनी शिंदे तसेच राजाभाऊ सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सौ.कदम मॅडम उपस्थित होते.

फी, देणगी, वर्गणी देण्यासाठी https://pay.paytm.com/MAZISH23249404229094 इथे क्लिक करा.
----------------------------------------
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
वेबसाईट - www.mazisheti.org
सोशल मिडिया - www.mazisheti.org/p/sm.html
----------------------------------------

Monday, March 6, 2017

माझीशेती : महिला सबलीकरण (170305)

माझीशेती : सावळज येथे ग्रामीण भागातील महिला सबलीकरण अंतर्गत सुझलन फाऊंडेशन आणि येरळा विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बेसिक शिलाई, आधुनिक ब्लाउज, आधुनिक मुलींचे ड्रेस शिलाईचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.


यावेळी श्री. सागर खोत यांच्यासोबत माझीशेती शेतकरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश बोरगे (Mahesh Borge, सावळज) , श्री. राजू पाटील, तासगाव उपस्थित होते. ग्रामीण भागात वेगवेगळ्या योजनेतून शिलाई मशीन पुरवण्यात येतात पण त्या चालवायच्या कश्या आणि उपजिविकेचे माध्यम म्हणून मशीनचा उपयोग होणे गरजेचे आहे.

सुझलानच्या सामाजिक बांधीलकी निधीतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थित महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून Mazisheti Pratishthan कडुन या प्रशिक्षणार्थ्यांना ऍडव्हान्सड ड्रेस पेंटिंग आणि जरदोजीचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासन महेश बोरगे यांनी दिले.

पिक लागवड व सल्ला अधिक माहितीसाठी www.mazisheti.org/p/shivar.html वाचा.

आमच्या व्हाट्स ऍप ग्रुपमध्ये सहभागी व्हा, www.mazisheti.org/p/whatsapp.html आणि कोणत्याही अवांतर मेसेजच्या त्रासाशिवाय शेतीची माहिती घ्या. (फक्त सदस्यांना मर्यादित)

नोंदणी फी, देणगी, सभासद वर्गणी देण्यासाठी https://pay.paytm.com/MAZISH23249404229094 इथे क्लिक करा.
--------------------------------------------------
माझीशेती शेतकरी प्रतिष्ठान
वेबसाईट - www.mazisheti.org
सोशल मिडिया - www.mazisheti.org/p/sm.html
-------------------------------------------------

Friday, March 3, 2017

माझीशेती:शेतीसल्ला(१७०३०३)


     मशरूम(आलिंबी)

·                                    मशरूमला जगभर एक पौष्टिक अन्नम्हणून मान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये मशरूमचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन नुकतेच सुरु झाले आहे व जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.आपल्या शरीराच्या वाढीसाठी व सुस्थितीत राहण्याकरिता १० अमिनो आम्लांची गरज असते. ही दहा अमिनो आम्ले मशरूम मध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत.
·                             मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण ते संपूर्णतः शाकाहारी असून त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. मशरूमवरील संशोधनानंतर मशरूम मध्ये अॅन्टी व्हायरलअॅन्टी कॅन्सरचे विशेष गुणधर्म आढळून आले आहेत. मशरूममध्ये तंतुमय पदार्थ अधिक आहेत. तसेच फॉलिक अॅसिड आहे. हे दोन्ही घटक पचनक्रिया सुरळीत ठेवण्याकरिता मदत करतात. कमी उर्जेचा आहार, वजन कमी करण्याकरिता उत्तम असतो. मशरूम मध्ये कमी उर्जा, प्रथिने, जीवनसत्वे व तंतुमय पदार्थ असतात. हा आहार लठ्ठ व्यक्तींकरिता उत्तम आहे.
                मशरूम लागवड प्रक्रिया
*काड भिजवणे:
प्रथम काड लांब असल्यास त्याचे ३-५ सें.मी. चे तुकडे करावेत. नंतर थंड पाण्यात १०-१२ तास भिजवावे. भिजलेले काड बाहेर काढून निर्जंतुक करावे. निर्जन्तुकीकरणा करिता गरम पाण्यात १ तास ठेवावे.
*निर्जंतुकीकरण:
निर्जंतुकीकरणा करिता २०० लि. क्षमता असणारा गंज नसणारा ड्रम घ्यावा. त्यात १०० लि.पाणी टाकावे व ते ८० ते ८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावे व त्यात भिजवलेले काड १ तास ठेवावे. त्यानंतर २ तास निर्जंतुक केलेले काड निथळण्याकरिता ठेवावे.
*बी पेरणे:
प्लास्टिकच्या पिशवीत काडाचा थर द्यावा. अंदाजे दोन ते अडीच इंच. नंतर त्यावर पिशवीच्या कडेने बी पेरावे. बीच्या थरावर पुन्हा काडाचा थर द्यावा. पुन्हा बी चा ठार, असे करून पिशवी भरावी.
बी पेरताना ओल्या काडाच्या २% प्रमाणात पेरावे. पिशवी भरताना काड दाबून भरावे. पिशवी भरल्यावर दोर्याच्या सहाय्याने तोंड बांधावे व पिशवीला २५-३० छिद्रे मारावीत. छिद्रे पाडताना दाभान किंवा गंज नसलेल्या सुईचा वापर करावा.
*उबविणे:
बुरशीच्या वाढीकरिता उबविने ही महत्वाची क्रिया आहे. बी पेरून बांधलेल्या पिशव्या निर्जंतुक खोलीत ठेवाव्यात. खोलीत अंधार ठेवावा व तापमान २२ ते २६ अंश सेल्सियस ठेवावे.
*पिशवी काढणे:
पिशवीमध्ये बुरशीची पूर्ण वाढ झाल्यावर ती पांढरी दिसते. ती ब्लेडने कापून काढावी व रॅकवर ठेवावी. तापमान २० ते ३० अंश सेल्सियस  व आद्रता ७०-८५% राहील याची दक्षता घ्यावी. खोलीमध्ये अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश (संधीप्रकाश) व हवा खेळती ठेवावी. पिशवीतून काढलेल्या बेडवर एक दिवसानंतर पाण्याची हळुवार फवारणी करावी. दिवसातून ३-४ वेळा पाण्याची फवारणी करावी. फवारणी करण्याकरिता पाठीवरचा स्प्रे पंप किंवा हॅन्ड स्प्रेचा वापर करावा.
*काढणी:
मशरूमची पूर्ण वाढ पिशवी फाडल्यानंतर ४-५ दिवसांत होते. वाढ झालेले मशरूम हाताने उजवीकडे किंवा डावीकडे वळवून काढावेत. मशरूमकाढल्यानंतर बेड एक ते दीड इंच खरडावा व पाणी द्यावे. १० दिवसांनी दुसरे पीक, परत १० दिवसांनी तिसरे अशी तीन पिके मिळतात.
एका बेड (पिशवी) पासून ९०० ते १५०० ग्रॅम पर्यंत ओली आळिंबी मिळते. शिल्लक राहिलेल्या बेडचा वापर झाडांना खत, जनावरांना पौष्टिक चारा म्हणून करण्यात येतो.
                आळिंबी लागवड प्रक्रिया:
काड भिजवणे १२ ते १५ तास गरम पाण्यात निर्जंतुक करणे
१ तास
पिशव्यांमध्ये बी भरणे
उबविणे
१४ ते २० दिवस
पिशवी काढणे
२-३ दिवस
१ ली काढणी
४-६ दिवस
२ री काढणी
५-६ दिवस
३ री काढणी
                   साठवण
        ज्या आळिंबीची (मशरूमची) साठवण छिद्रे पाडलेल्या २००-३०० गेजच्या प्लास्टिक पिशवीत करतात. ४-५ दिवस फ्रीजमध्ये मशरूमउत्तम राहते. मशरूम उन्हात दोन दिवसात उत्तम वळते. मशरूम वाळवण्याकरिता ४५-५० अंश सेल्सियस तापमान योग्य ठरते. वाळविलेले मशरूम सीलबंद पिशवीत भरून ठेवावे.
मशरूम उत्पादन येण्याकरिता महत्वाच्या बाबी :
१. मशरूम उत्पादन परिसर स्वच्छ ठेवावा.
२. मशरूमचे उत्पादन बंदिस्त जागेतच घ्यावे.
३. मशरूमच्या खोलीत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यावी.
४. खोलीतील तापमान ३० अंश सेल्सियस व आद्रता ८०% राहील याची काळजी घ्यावी.
५. आळिंबी लागवड करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी. स्वच्छ कपडे, चप्पल यांचा वापर करावा.
६. नवीन व स्वच्छ कोरडा कच्चा माल वापरावा.
७. काडाचे निर्जंतुकीकरण महत्वाची प्रक्रिया आहे. ती योग्य करावी.
८. सूर्यप्रकाश प्रत्यक्ष येऊ देऊ नये. संधीप्रकाश बॅग उघडल्यावरच भरपूर ठेवावा.
९. मशरूम बेडवर फवारण्याचे पाणी स्वच्छ असावे.
१०. पिशव्या भरण्यापूर्वी काड फार ओले नसावे. हाताने दाबून पाहावे. पाणी न निघाल्यास भरण्यास योग्य आहे, असे समजावे.
११. पिशव्या ठेवताना दोन पिशव्यातील अंतर १० इंच ठेवावे.
१२ .रोग, किडीचा, चिलटांचा प्रादुर्भाव झाल्यास नुवान ( १ मि.मि., १ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.)
१३. आळिंबीचे स्पॉन विश्वसनीय संस्थेमार्फतच घ्यावे. जुने, काळसर, हिरवी बुरशी असणारे स्पॉन वापरू नये.
१४. भरलेल्या बेड (पिशव्या) मध्ये कीडी, रोगांचा प्रादुर्भाव झाला तर नाही ना, या करिता दर रोज निरीक्षण करावे.
१५.  मशरूमची काढणी वेळेत करावी. योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. उन्हात किंवा ड्रायरमध्ये आळिंबी सुकवून सीलबंद पाकिटात साठवण करावी.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास आपण यशस्वी उत्पादन घेऊ शकतो.

         
                मशरूमची विक्री व्यवस्था
१) ताजे मशरूम २५ ते ३० रुपये प्रति किलो घाऊक दराने विकले जातात. पुणे- मुंबईत भाजी मंडईत सहज विक्री होत आहे.
२) वाळवलेले मशरूम विक्री हा ताज्या मशरूम पेक्षा विक्रीस सोपा प्रकार आहे. ताजे मशरूम वाळवून (सूर्यप्रकाशात/ड्रायर मध्ये) सीलबंद केल्यास ३ वर्षे टिकतात. त्यामुळे खराब होण्याची भीती नाही. वाळविलेले मशरूम २५० ते ३०० रुपये प्रति किलो दराने खरेदी केले जातात.
                                                                           स्रोत:वनराई संस्था 

Tuesday, February 28, 2017

पालक: भाजीपाला (१७०२२८)

प्रस्‍तावना
       पालक ही अतिशय लोकप्रीय पालेभाजी असून या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करता येते. तसेच या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमुल्‍ये लक्षांत घेतांं पालकाची लागवड मोठया प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे.
     पालकाच्‍या भाजीत अ आणि क  जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन्‍स आणि कॅल्शिअम, लागवडीसाठी लोह, फॉस्‍फरस इत्‍यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकांचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्‍यादीमध्‍ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे.
हवामान
      पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्‍यामुळे महाराष्‍ट्रात कडक उन्‍हाळयाचे एक दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्‍पादन जास्‍त येऊन दर्जा चांगला राहतो. तर तापमान वाढल्‍यास पीक लवकर फूलो-यावर येते आणि दर्जा खालावतो.
जमीन
    पालकाचे पीक विविध प्रकारच्‍या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्‍या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
सुधारीत जाती 
   पालक ऑल ग्रिन पुसा ज्‍योती, पुसा हरित या पालकाच्‍या भारतीय कृषी संशोधन संस्‍था नवी दिल्‍ली येथे विकसि‍त करण्‍यात आलेल्‍या सुधारित जाती आहेत.
लागवड
  महाराष्‍ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून – जूलैमध्‍ये आणि रब्‍बी हंगामातील लागवड सप्‍टेबर आक्‍टोबरमध्‍ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्‍यासाठी 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने हप्‍त्‍या हप्‍त्‍याने बियांची पेरणी करावी. पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्‍यामुळे जमिनीच्‍या मगदुरानुसार योग्‍य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फेकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्‍यास वापसा आल्‍यावर पेरणी  करावी. बी ओळीत पेरतांना दोन ओळीत 25-30 सेंटीमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्‍यास पिकाची वाढ कमजोर होवून पानांचा आकार लहान राहतो आणि पिकांचा दर्जा खालावतो. लागवडीपूर्वी बियाण्‍याला थायरम या बुरशीनाशकाची 2 ग्रॅम दर किलो बियाण्‍याला या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्‍यामुळे मर रोगाला प्रतिबंध होतो. पालकाच्‍या एक हेक्‍टर लागवडीसाठी 25-30 किलो बियाणे लागते.
खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन
     पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्‍या टवटवीत पानांवर पिकाचे उत्‍पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्‍यामुळे पालकाच्‍या पिकाला नत्राचा मोठया प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्‍याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्‍यक आहे.
पालकाच्‍या पिकाला जमिनीच्‍या मगदुरानुसार हेक्‍टरी 20 गाडया शेणखत 80 किलो नत्र 40 किलो स्‍फूरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्‍या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्‍फूरद आणि पालाश 1/3 नत्र पेरणीच्‍या वेळी द्यावे. उरलेले नत्र 2 समान भागांत विभागातून पहिल्‍या आणि दुस-या कापणीच्‍या वेळी द्यावे. ज्‍या जातीमध्‍ये दोन पेक्षा जास्‍त कापण्‍या करता येतात तेथे प्रत्‍येक कापणीनंतर हेक्‍टरी 20 किलो नत्र द्यावे.
     पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्‍पादन वाढविण्‍यासाठी बी उगवून आल्‍यानंतर 15 दिवसानी आणि प्रत्‍येक कापणी नंतर 1.5 टक्‍के युरिया फवारावा. बियांच्‍या पेरणीनंतर लगेच पाणी दयावे किंवा वापसा आल्‍यानंतर पेरणी करावी. त्‍यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्‍यानंतर पिकाला नियमित पाणी दयावे. हिवाळयात पालकाच्‍या पिकाला 10 ते 12 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्‍या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्‍यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.
किड रोग आणि त्‍यांचे नियंत्रण
    पालकावर मावा, पाने कुरतडणारी अटी आणि भुंगेरे यांचा उपद्रव आढळतो.या किडींच्‍या नियंत्रणासाठी पीक लहान असतानांच 8 ते 10 दिवसांच्‍या अंतराने 15 मिली एन्‍डोसल्‍फॉन ( 35 टक्‍के प्रवाही ) 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे. काढणीच्‍या 8 – 10 दिवस आधीच फवारणी करू नये.
    पालकावर मर रोग,  पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो.मर रोगामुळे उगवण झाल्‍यावर रोपांची मर होण्‍यास सुरुवात होते. हया रोगाच्‍या नियंत्रणासाठी पाण्‍याचा योग्‍य निचरा करावा आणि पेरणीपूर्वी बियाण्‍यावर थायरम हया बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्दता वाढल्‍यास पानांवर गोल करडया रंगाचे बांगडीच्‍या आकाराचे डाग पडतात. हया बुरशीजन्‍य रोगामुळे पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्‍या नियंत्रणासाठी ताम्रयुक्‍त बुरशीनाशकाची उदाहरणार्थ, ब्‍लॉयटॉक्‍स किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराईड 10 लिटर पाण्‍यात 20 ग्रॅम हया प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
  केवडा आणि तांबेरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्‍यास या रोगांना आळा बसतो.
काढणी उत्‍पादन आणि विक्री
    पेरणी नंतर सुमारे 1 महिन्‍याने पालक कापणीला तयार होते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्‍यावर पानांच्‍या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेमी भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्‍यावा. आणि पानांच्‍या जूडया बाधाव्‍यात. त्‍यानंतर 15 दिवसाच्‍या अंतराने जातीनुसार 3-4 किंवा त्‍यापेक्षा जास्‍त खुडे करावेत. कापणी करतानांच खराब रोपे वेगळी काढून जुडया बांधाव्‍यात काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुडया उघडया जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्‍या टोपल्‍यामध्‍ये अगर पोत्‍यामध्‍ये  व्‍यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवाव्‍यात. टोपलीच्‍या खाली आणि वर कडुनिंबाचा पाला ठेवल्‍यास पालक लागवडीसाठीवकर खराब होत नाही. वाहतुकीस जुडयांवर अधून-मधून थंड पाणी शिंपडल्‍यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो. मात्र पाणी जास्‍त झाल्‍यास सडण्‍याची क्रिया सुरु होते. म्‍हणून जुडयांवर जास्‍त प्रमाणात पाणी मारु नये.  पालकाचे उत्‍पादन पिकाच्‍या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्‍य काळजी यांवर अवलंबून असते. सर्वसाधारण्‍पणे हेक्‍टरी 10 ते 15 टन एवढे उत्‍पादन मिळते. शिवाय बियाण्‍याचे उत्‍पादन 1.5 टनापर्यंत मिळू शकते.
                                                       स्त्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

Wednesday, February 22, 2017

माझीशेती :व्यवसाय सल्ला(१७०२२२)

व्यवसाय विकासासाठी काही आवश्यक टिप्स
आपण आपला व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात का? तर मग तुमच्यासाठी या उर्वरित टिप्स... तुमचे व्यवसाय विकासाचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मदत करू शकतात.

  • अपयश किंवा यश या जबाबदारीवर भर:                                                    एक चांगला व्यावसाईक विकसित होण्यासाठी ध्येयाबरोबर अंतर्गत स्त्रोत असणे ही महत्त्वाचे आहेत.सुरवातीपासून यश किंवा अपयश हे आपल्या मालकीचे पाहिजे कारण प्रत्येक व्यवसायात चढउतार येतच असतात.
·  संधी मूल्यांकन:
      कंपनीचा विकास करारावर अर्थ प्राप्त होतो का समजून घेणे आवश्यक आहे. नवीन व्यावसाईकाना नवीन बाजार करण्यास कंपनी सक्षम आहे का? ध्येय स्पष्ट असले पाहिजे.

· सौदे (deals)काळजीपूर्वक करा:
            करार करणे आणि योग्य करार करणे या दरम्यान एक मोठा फरक आहे. एक चांगला dealmaker खोटे सिग्नल ओळखण्यास मदत करू शकतो - फक्त पुरेशी बाजार गती आणि महसूल आहे तेव्हा जास्त संधी लपवू शकता. उलट, कमी अनुभवी dealmaker, किंवा चुकीचे प्रोत्साहन एक मोठा संधी पासून कंपनीचे  लक्ष विचलित करण्यासाठी फक्त पुरेशी गती निर्माण करू शकता. अनेक कंपन्याचे करार फसल्यामुळे मार्केट value कमी झाली आहे.- आपण आपल्या व्यवसाय विकास व्यक्ती समजून आणि विश्वासर्हता स्तर विकसित करायचा असतो.

·  कायदेशीर सल्ला मिळवा:
      एक कायदेशीर करारामध्ये व्यवसाय व्यवस्था codifies करणे आणि बाहेर काम नाही झाले तर काय घडते या व्यावसायिक अटीचा समावेश आहे. या व्यवसाय विकासासाठी  व्यवसाय संधी आणि व्यवसाय धोका याचे मूल्यांकन करणे आणि व्यवस्थापन tradeoffs स्पष्ट करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणे  आवश्यक आहे. उत्तम उत्पादन आणि एक उत्तम संघ कंपनीच्या विकासासाठी भरपूर आवश्यक आहे.

तुमचे व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी http://www.mazisheti.org/p/h2o.html या पेज ला भेट द्या.