Sunday, October 30, 2016

तुमचा लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का?? - महेश बोरगे

तुमच्या किंवा तुमच्याशी संबंधित असलेल्या मित्र-मैत्रिणीं, सहकारी, कुटुंबे, नातेवाईकांमध्ये सुस्थितीत असलेले लॅपटॉप / डेस्कटॉप आम्हाला द्याल का??? 



आधुनिक शेती किंवा नाविन्यपुर्ण व्यावसायिक शेती करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे क्रमप्राप्त आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आजही संगणक वापरताना मागे हटतो परिणामी शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आणि सहकार्यापासुन शेतकरी दुर राहतात. माझीशेतीच्या प्रशिक्षण विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणातून असे पुढे आले आहे. यामध्ये प्रामुख्याने संगणक वापरता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संगणक प्रणाली घेणे टाळतो. माझीशेतीकडून याविषयावर सविस्तर चर्चा करून व्यावसायिक शेती अभ्यासक्रम सुरू करणेत आला आहे. परंतु शेतकऱ्यांची उत्पादकता कमी असल्यामुळे शेतकरी संगणक घेणे आवश्यक बाब समजत नाही. यामुळेच माझीशेतीकडून व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना लॅपटॉप / डेस्कटॉप देण्याचे ठरविले आहे. 

आपण दिपावलीच्या मंगल प्रसंगी लॅपटॉप, डेस्कटॉप, आधुनिक मोबाईल खरेदी करतो, तुम्हीही केला असेलच. अश्यावेळी जुना लॅपटॉप / डेस्कटॉप घरी पडून असेल तर तो कृपया आम्हाला द्या. डिजिटल इंडिया मध्ये 1% शेतकरी डिजिटल आहेत मात्र 99% अजूनही प्रतीक्षेत आहेत. तुमचा पुढे केलेला एक हात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जाणार आहे. 

आपणाकडून मिळालेले लॅपटॉप / डेस्कटॉप ग्रामीण भागातील गरजू शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना गरजेचे आणि अतिशय महत्त्वाची संसाधने मिळवण्यासाठी आपण दिलेल्या डोनेशनचा उपयोग केला जातो. दैनंदिन जीवनातील शेतीच्या कामकाजासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून घ्यावयाच्या माहितीसाठी आणि मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी वापर करायला देण्यात येणार आहेत. 

माझीशेतीचा दस्तऐवजामध्ये / डेड स्टॉकमध्ये तुमच्या दिलेल्या योगदानाचा समावेश केला जाईल व योग्य तपासणी करून गरजू शेतकरी गटांना प्रति गट एक याप्रमाणे संगणक देण्यात येईल. यामुळे झालेल्या अमुलाग्र बदलाचा मासिक अहवाल सर्वत्र प्रकाशित केला जाईल. 

Call us - 9975740444
Write us - mazishetifoundation@gmail.com
Know us - mazisheti.org
Like us - fb.com/agriindia
Twit abt us - @mazisheti
Link with us - LinkedIn.com/in/mazisheti

Tuesday, October 25, 2016

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान...

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान
दोन हजार शेततळ्यांना मिळणार लाभ 

पुणे - पाणीटंचाईच्या काळात शेततळ्यांतील पाण्याचा योग्य वापर करून फळबागा जगविण्यासाठी शेतकरी त्यांचा आधार घेत आहेत. शेततळ्याच्या आकारमानानुसार व योजनेनुसार जास्तीत जास्त साडेपाच लाखांपर्यंतचे अनुदान मिळेल.

वाढत्या पाणीटंचाईमुळे या फळबागा जगविणे मोठे आव्हान बनले अाहे. शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (दोन किवा अधिक लाभार्थी) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यांचा शंभर टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. 

या दोन्ही योजनेतून २००५ ते २०१४-१५ या कालावधीत राज्यात तब्बल २३ हजार ९०८ शेततळे घेतली असून त्यासाठी शासनाने ४५७ कोटी ९२ लाख रुपये अनुदानापोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात २०१२ नंतर वाढत्या दुष्काळामुळे शेततळ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली. तर २०१३-१४ यामध्ये या एकाच वर्षी राज्यात सर्वाधिक म्हणजेच ९७०४ एवढी शेततळी झाली. त्यानंतर शेततळ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळ्यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेततळ्यांच्या प्रकारानुसार अनुदान 
सध्या योजनेअंतर्गत हाफ डगआऊट, फुलली डगआऊट आणि बोडी टाइप असे शेततळ्यांचे तीन प्रकार आहेत. बहुतांश शेतकरी हाफ डगआऊट प्रकाराची शेततळी घेत आहेत. यासाठी साधारणपणे कमीत कमी पाचशे घनमीटर पाणीसाठ्यासाठी १४ बाय १४ बाय ३ मीटर आकारामानाच्या शेततळ्यासाठी ६५ हजार रुपये एवढे अनुदान मिळते. जास्तीत जास्त दहा हजार घनमीटरच्या पाणीसाठ्यासाठी ४४ बाय ४४ बाय ५.४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पाच लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्याजवळ फळबाग असणे अावश्यक आहे.

पाणीटंचाईमुळे सामूहिक शेततळ्याला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिली आहे.
- सुभाष जाधव, संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 

Wednesday, October 19, 2016

हरभरा लागवड

साधारणपणे जगातील एकून हरबऱ्याच्या पिकापैकी ७८% पीक भारत व ९% पीक पाकिस्तानात पेरले जाते, उरलेले १३ % पीक जगातील इतर भागांत पेरले जाते. भारतामध्ये हे पीक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व कर्नाटक या राज्यांत मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

महत्त्व : हरबऱ्याचे कोवळे शेंडे भाजी म्हणून वापरतात. दाणे पक्व होण्यापूर्वी कच्च्या स्वरूपात खाल्ले जातात. हरबऱ्यांच्या मुळावरील गाठींमुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण वाढते. हरबऱ्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे घोडे व इतर जनावरांना खुराक म्हणून हरबरा दिला जातो. मिठाई करण्यासाठी चण्याच्या पिठाचा उपयोग करतात. टरफलासह दाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते १९ % असते. नुसत्या डाळीत २२ ते २५ % असते. हरबऱ्याच्या कोवळ्या पानात मॅलिक व ऑक्झॉंलिक आम्ल असते.

जमीन व हवामान : मध्यम किंवा मध्यम भारी रानात हरबऱ्याचे पीक घेतात. कमी ते मध्यम पावसाच्या प्रदेशात (६५० ते १००० मिमी) हे पीक उत्तम प्रकारे घेता येते. कडाक्याची थंडी मात्र या पिकास सहन होत नाही. ५ डी. सेल्सिअसच्या वर तापमान असणाऱ्या भागात हरबऱ्याची वाढ चांगली होते.

पूर्व मशागत : खरीपाचे पीक काढल्यानंतर १ नांगरट व कुळवाच्या २ पाळ्या देतात. मशागतीच्या वेळीच पूर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो एकरी द्यावे.

बी - बियाणे आणि पेरणीचा कालावधी :

जातीपरत्वे हरबऱ्याचे एकरी बियाणे २५ ते ४० किलो लागते. हरभऱ्याची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेनंतर ३ - ४ आठवड्यांपर्यंत करतात.

बीजप्रक्रिया : मर या रोगापासून वाचविण्यासाठी आणि उगवण चांगली होण्यासाठी जर्मिनेटरची बीज प्रक्रिया करवी. हरबऱ्याचे १ किलो बी जर्मिनेटर २० ते २५ मिली + १ लि. पाण्यात अर्धा तास भिजवून सावलीत सुकवून पेरावे. म्हणजे उगवण चांगली होते, तसेच हवेलीत नत्र खेचून हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी वाढतात. त्यामुळे रासायनिक खतात बचत होते. जमीन खराब न होता जमिनीची जैविक सुपिकता वाढते. त्यामुळे उत्पादन व दर्जा दोन्हीत वाढ होतो.

सुधारित वाण : हरबऱ्याचे विविध सुधारित वाण पुढील तक्त्यात दिले आहेत.
अ. क्र.  वाण  पिकाचा कालावधी (दिवस)  उत्पन्न (क्विं./ एकरी)  प्रमुख वैशिषट्ये  
१)  विकास  १०५ -११०  जिरायत ४.५ ते ५ बागायत ९ ते १०  जिरायत क्षेत्रासाठी योग्य वाण  
२)  विश्वास  ११५ - १२०  जिरायत ४ ते ४.५ बागायत ११ ते १२  टपोरे गोल दाणे, पाणी व खतास प्रतिसाद देणारा वाण, राष्ट्रीय वाण म्हणून प्रसारित  
३)  फुले जी - १२  १०५ -११०  जिरायत ५ ते ५.५ बागायत ११ ते १२  जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य वाण  
४)  विजय  ८५ - ९०  जिरायत ६ ते ६.५  मर रोगास प्रतिकारक्षम तसेच अवर्षण प्रतिकारक्षम जिरायत बागायत तसेच उशीर पेरणीसाठी योग्य वाण. आकर्षक पिवळे टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादन क्षमता.  
५)  विशाल  ११० -११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १४  
६)  श्वेता  १०० -१०५  जिरायत ३.५ ते ४ बागायत ७.५ ते ८  काबुलीवाण, मर रोगास प्रतिकारक्षम, टपोरे दाणे, हळवा वाण.  
७ )  भारती  ११०-११५  जिरायत ५.५ ते ६ बागायत १२ ते १३  मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत तसेच बागायतीसाठी योग्य  


पेरणीच्या वेळी तापमानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी पेरणी करावी. पेरणी जर तिफणीने केली तर दोन ओळींत ३० ते ४५ सेंमी अंतर ठेवतात. पेरणी जमिनीखाली ७ ते १० सेंमी खोल करावी.

आंतरमशागत व तणनियंत्रण : पेरणीनंतरसुरूवातीचे ४ ते ६ आठवडे जमीन तणविरहित ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी १ खुरपणी व १ कोळपणी आवश्यक आहे. पेरणीनंतर कोळपे फिरवल्यास हवा खेळती राहून पीक चांगले वाढते.

खत व्यवस्थापन : उपलब्धतेनुसार पुर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत कोरडवाहू पिकास ५० ते ७५ किलो तर बागायत पिकास १०० ते १५० किलो एकरी द्यावे.

पाणी व्यवस्थापन : पेरणीनंतर ८ - १० दिवसांनी एक व घाटे भरून काढण्याच्या वेळी एक अशा किमान २ - ३ वेळा पाणी दिल्यास पीक उत्तम येते. तथापि हवामानात उष्णतेचे प्रमाण वाढत गेल्यास पाण्याची जादा पाळी देणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जादा पाणी देण्याचे मात्र कटाक्षाने टाळावे. कारण जादा पाण्यामुळे वाढ जादा होऊन घाटे येण्याचे प्रमाण मात्र कमी होते व पर्यायाने उत्पन्न कमी होते.

पीक संरक्षण : हरबऱ्यावर मुख्यत्वे मुळकुजव्या मर, भुरी आणि गेरवा हे रोग पडतात.

पेरणीनंतर लगेचे हवेतील तापमानात वाढ झाल्यास मुळकुजव्या रोगाचा उपद्रव होतो. लहान - लहान रोपे वाळू लागतात व मरतात, यासाठी तापमान योग्य व थंड असतानाच पेरणी करावी आणि बीजप्रक्रियेला जर्मिनेटर आवश्य वापरावे. मर हा रोग जिवाणूंमुळे होतो. चांगले वाढलेले झाड एकाएकी वरपासून वाळू लागते. यासाठी एन -३१ व एन -५९ या जाती रोगप्रतिबंधक जातींची शिफारस केलेली आहे.

हरबऱ्यातील कीड :

घाटेअळी : हरभऱ्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या किडीत घाटेअळी प्रमुख आहे. घाट्यात अळी शिरते व आतील सर्व दाणे फस्त करते. या अळीचा बंधोबास्त करण्यासाठी प्रोटेक्टंट या किटकनाशकाचा वापर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांमध्ये पुढीलप्रमाणे दर पंधरा दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेळा फुले येण्याच्या सुरूवातीपासूनच केल्यास पिकाचे संरक्षण होते. मात्र अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे जाणवताच रासायनिक किटकनाशकाची फवारणी घ्यावी.

हरबऱ्याची वाढ समाधानकारक होऊन अधिक फुल - फलधारणा होऊन घाट्यामध्ये ठसठशीत दाणे भरण्यासाठी अर्थातच दर्जा व उत्पदान वाढीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

फवारणी:

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (३० ते ४० दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ३५० मिली. + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( ४५ ते ६० दिवसांनी) : थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर ३५० ते ४०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

४) आवश्यकता भासल्यास (प्रतिकुल हवामानात) चौथी फवारणी ७५ दिवसांनी : वरीलप्रमाणेच (तिसरी फवारणीप्रमाणे) फवारणी करावी. मात्र यामध्ये थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, आणि न्युट्राटोन प्रत्येकी १ मिली प्रती लि. पाण्यामध्ये जादा द्यावे.

पीकपक्वता / काढणी : शेताच्या सर्व भागांतील पीक वाळल्यावर पाने झडतात. त्यानंतर पिकाची कापणी जमिनीलगत कापून केल्यास नत्राच्या गाठी असलेल्या मुळ्या जमिनीत राहून त्यातील नत्राचा पुढील पिकास उपयोग होतो. डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा वापर वरीलप्रमाणे केल्यास हरबऱ्याच्या मुळावर नत्राच्या गाठी नेहमीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक आल्याचे कृषी विज्ञान मधून शेतकऱ्यांनी कळविले आहे. (संदर्भासाठी कृषी विज्ञानचे मागील अंक वाचावेत. ) साधारणत: कोरडवाहू क्षेत्रामध्ये एकरी २०० ते ३०० किलो तर बागायती क्षेत्रामध्ये ६०० ते ९०० किलो इतके उत्पादन येते.