Tuesday, October 25, 2016

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान...

शेततळ्यासाठी साडेपाच लाखांपर्यंत अनुदान
दोन हजार शेततळ्यांना मिळणार लाभ 

पुणे - पाणीटंचाईच्या काळात शेततळ्यांतील पाण्याचा योग्य वापर करून फळबागा जगविण्यासाठी शेतकरी त्यांचा आधार घेत आहेत. शेततळ्याच्या आकारमानानुसार व योजनेनुसार जास्तीत जास्त साडेपाच लाखांपर्यंतचे अनुदान मिळेल.

वाढत्या पाणीटंचाईमुळे या फळबागा जगविणे मोठे आव्हान बनले अाहे. शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (दोन किवा अधिक लाभार्थी) आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यांचा शंभर टक्के अनुदानावर लाभ दिला जातो. 

या दोन्ही योजनेतून २००५ ते २०१४-१५ या कालावधीत राज्यात तब्बल २३ हजार ९०८ शेततळे घेतली असून त्यासाठी शासनाने ४५७ कोटी ९२ लाख रुपये अनुदानापोटी उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात २०१२ नंतर वाढत्या दुष्काळामुळे शेततळ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली. तर २०१३-१४ यामध्ये या एकाच वर्षी राज्यात सर्वाधिक म्हणजेच ९७०४ एवढी शेततळी झाली. त्यानंतर शेततळ्यांच्या संख्येत घट झाली असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी सामूहिक शेततळ्यांचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेततळ्यांच्या प्रकारानुसार अनुदान 
सध्या योजनेअंतर्गत हाफ डगआऊट, फुलली डगआऊट आणि बोडी टाइप असे शेततळ्यांचे तीन प्रकार आहेत. बहुतांश शेतकरी हाफ डगआऊट प्रकाराची शेततळी घेत आहेत. यासाठी साधारणपणे कमीत कमी पाचशे घनमीटर पाणीसाठ्यासाठी १४ बाय १४ बाय ३ मीटर आकारामानाच्या शेततळ्यासाठी ६५ हजार रुपये एवढे अनुदान मिळते. जास्तीत जास्त दहा हजार घनमीटरच्या पाणीसाठ्यासाठी ४४ बाय ४४ बाय ५.४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पाच लाख ५६ हजार रुपयांचे अनुदान मिळते. त्यासाठी प्रामुख्याने शेतकऱ्याजवळ फळबाग असणे अावश्यक आहे.

पाणीटंचाईमुळे सामूहिक शेततळ्याला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी दिली आहे.
- सुभाष जाधव, संचालक, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान