Tuesday, November 24, 2015

हिरवी मिरची

जमीन 

पाण्‍याचा उत्तम निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पिक चांगले येते. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

लागवड
खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.


** वाण
पुसा ज्‍वाला -
ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

पंत सी – 
हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

संकेश्‍वरी 32 – 
या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

जी – 2, जी – 3, जी – 4, जी – 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.
मुसाळवाडी – 
या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पुसा सदाबहार – 
या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडी योग्‍य आहेत.

** बियाणाचे प्रमाण
हेक्‍टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.


** पूर्वमशागत
एप्रिल मे महिन्‍यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्‍टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.


** लागवड
जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले  जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.


बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यामध्‍ये 10 टक्‍के फोरेट दाणेदार 15 ग्रॅम दर वाफयाला टाकून मातीने झाकून घ्‍यावे. त्‍यानंतर या ओळीमध्‍ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे.  बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी. रोपे गादीवाफयातून काढल्‍यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोफॉस 36 टक्‍के प्रवाही अधिक 25 ग्रॅम डायथेनम 45 अधिक 30 ग्रॅम पाण्‍यात मिसळणारे गंधक 80 टक्‍के मिसळलेल्‍या द्रावणात बुडवून लावावेत.

** खत व्‍यवस्‍थापन
वेळेवर वरखते दिल्‍यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते. मिरचीच्‍या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि ओलिताच्‍या पिकासाठी दर हेक्‍टरी 100 किलो नत्र 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी स्‍फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावीत. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्‍दतीने द्यावी.


** पाणी व्‍यवस्‍थापन
मिरची बागायती पिकाला जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.  प्रमाणापेक्षा जास्‍त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्‍याचा ताण देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे. त्‍यानंतर 5 दिवसांच्‍या किंवा एक आठवडयाच्‍या अंतराने पाणी दयावे. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्‍या अंतराने तर उन्‍हाळयात 6 ते 8 दिवसांच्‍या अंतराने   पिकाला पाणी दयावे.


** आंतरमशागत
मिरचीच्‍या रोपांच्‍या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी त्‍यानंतर तणांच्‍या तीव्रतेनुसार खुरपण्‍या करून शेत तणविरहीत ठेवावे. खरीप मिरचीला लागवडी नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना माीची भर दयावी. बागायती पिकांच्‍या बाबतीत रोपांच्‍या लागवडीनंतर 2 महिन्‍यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्‍या ओळीच्‍या दोन्‍ही बाजूंनी मातीची भर द्यावी.


** रोग व्यवस्थापन
मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. लागण झालेली रोपे निस्‍तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्‍यामुळे रोप कोलमडते.
उपाय : 10 लिटर पाण्‍यात 30 ग्रॅम कॉपरऑक्‍झीक्‍लोराईड 50 टक्‍के मिसळून हेक्‍टरी द्रावण गादी वाफे किंवा रोपांच्‍या मुळा भोवती ओतावे.


फळे कुजणे आणि फांद्या वाळणे (फ्रूट रॉट अँड डायबॅक/ ऍन्थ्रॅक्‍नोज)
* कारण - हा रोग कॉलेक्‍टोट्रिकम कॅपसिसी या बुरशीमुळे होतो. सकाळी धुके व दव पडत असलेल्या ठिकाणी दमट वातावरण राहते. अशा ठिकाणी बुरशींचे बिजाणू वेगाने वाढतात.
* लक्षणे - या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट काळी कडा असलेले डाग दिसतात. फळावर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे सुकतात, कुजतात आणि गळून पडतात. (Like our page - www.fb.com/agriindia) बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात, तसेच पानांवर आणि फांद्यावर काळे ठिपके दिसतात.
* प्रसार - या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो.
* नियंत्रण - हा रोग बियाण्यापासून होत असल्यामुळे रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा.
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिमची ३ ग्रॅमप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
- या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त फांद्या गोळा करून जाळून नष्ट कराव्यात.
- रोगाची लक्षणे दिसताच कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड (५० टक्के डब्ल्यू.पी.) किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यू.पी.) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (Message by MAZISHETI FOUNDATION) आवश्‍यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांनी सल्ल्यानुसार घ्यावी.


२) भुरी (पावडरी मिल्ड्यू)
* कारण - हा रोग लव्हेलुला टावरिका या बुरशीमुळे होतो.
* लक्षणे - साधारणतः मिरची पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान दिसून येतो. या रोगामुळे पानाच्या खालील बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. नंतर ती पानाच्या पृष्ठभागावर पसरते. याची सुरवात जुन्या पानापासून होते. रोगाचे प्रमाण वाढल्यास पाने पिवळी होऊन गळून पडतात. प्रादुर्भाव वाढल्यास फुलांच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो.
* प्रसार - या रोगाचा प्रसार हवेद्वारे व रोगट पालापाचोळ्यातून होतो.
* नियंत्रण
- रोगट पालापाचोळ्यावर रोगाच्या बुरशीचे बिजाणू असतात. शेतातील जुने पीक अवशेष नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे.
- रोगाची लक्षणे दिसताच, गंधक (८० टक्के डब्ल्यू.पी.) ३० ग्रॅम किंवा डिनोकॅप (४८ टक्के ई.सी.) १० ग्रॅम किंवा ट्रायडेमाॅर्फ १० मिली किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १० ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) ५ मि.लि. किंवा मायक्लोब्युटॅनील १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी ८ ते १० दिवसांनी बुरशीनाशक बदलून घ्यावी.


** किड व्यवस्थापन
फूलकिडे : हेक्‍टरी किटक आकाराने अतिशय लहान म्‍हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्‍यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्‍यामुळे पानाच्‍या कडा वरच्‍या बाजूला चुरडलेल्‍या दिसतात. हेक्‍टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्‍यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय : रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्‍या अंतराने 8 मिलीमिटर डायमेथेएम 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

मावा : हेक्‍टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्‍यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय : लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली मोनोक्रोटोफॉस 36 टक्‍के प्रवाही 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.


विषाणूजन्य रोग
१) चुरडा-मुरडा (बोकड्या) -
कारण - हा रोग टोबॅको लिफकर्ल व्हायरस या विषाणूमुळे होतो.
* प्रसार - या विषाणूचा प्रसार पांढरी माशीमार्फत होतो.
* लक्षणे - या रोगामुळे पाने बारीक, वाकडीतिकडी होऊन सुरकुत्या पडल्यासारखी दिसतात. पाने मध्य शिरेकडे मुरडतात. पानांच्या शिरा सुजून जाड होतात. पानाचा रंग फिक्कट हिरवा पिवळसर, निस्तेज होऊन झाडाची वाढ खुंटते.

२) मोझॅक -
* कारण - हा रोग काकडी मोझॅक विषाणू, बटाटा विषाणू व तंबाखू मोझॅक विषाणू या विषाणूमुळे होतो.
* प्रसार - या विषाणूचा प्रसार मावा किडीमार्फत होतो.
* लक्षणे - या रोगामुळे पाने फिक्कट हिरवी होतात. पाने बारीक राहून त्यामध्ये हिरवट - पिवळसर डाग दिसतात. झाडाची वाढ खुंटते, फुले-फळे फार कमी प्रमाणात लागतात.

** विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण व्यवस्थापन -
- विषाणू रोगाचा प्रादुर्भाव हा पांढरी माशी, मावा या रसशोषण करणाऱ्या किडींद्वारे किंवा बियाण्यामार्फत होतो. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
- या रोगाचा प्रादुर्भाव रोपवाटिकेपासून पिकाच्या वाढीच्या कोणत्याही टप्प्यात होतो. विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे अवघड जाते. म्हणून रोगमुक्त बियाण्यांचा वापर आणि रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत किडींचा प्रादुर्भाव टाळण्यावर लक्ष द्यावे.
- रोगट झाडे दिसताच ती उपटून योग्य प्रकारे नायनाट करावा.
- शेतातील तणे नष्ट करावीत.
- पेरणीपूर्वी गादीवाफ्यावर फोरेट २५ ग्रॅम प्रति ३ x १ मीटर आकाराच्या गादीवाफ्यात मिसळावे.
- रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर ४० मेश नायलॉन नेट २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे टाकावे. त्यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
- रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ ई.सी.) ४ मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे तयार केलेल्या द्रावणामध्ये रोपाचा शेंड्याकडील भाग बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.
- पिवळे चिकट सापळे १२ प्रतिहेक्‍टर वापरावेत.
- मिरची पिकाच्या चहूबाजूला २-३ ओळी मका किंवा ज्वारीच्या पेराव्यात.
- लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने डायमेथोएट (३० टक्के ई.सी.) १० मि.लि. किंवा इमिडाक्‍लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.डी.जी.) २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल (५० टक्के एस.सी.) १० ग्रॅम किंवा ॲसीफेट (७५ टक्के एसपी) १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (४० टक्के ई.सी.) २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. आवश्यकतेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून फवारणी घ्यावी.
- दोन फवारण्यांमध्ये कडुनिंबावर आधारित ॲझाडिरेक्टीन (३००० पीपीएम) २५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- यानंतरही रोग नियंत्रणात येत नसल्यास, सायॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के एस.सी.) १८ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.


** काढणी व उत्‍पादन
हिरव्‍या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्‍यांनी सुरु होते. पुर्ण वाढलेल्‍या व सालीवर चमक असलेल्‍या हिरव्‍यसा फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्‍या अंतराने करावी. साधारपणपणे हिरव्‍या मिरच्‍यांची तोडणी सुरु झाल्‍यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात. वाळलेल्‍या मिरच्‍यांसाठी त्‍या पूर्ण पिकून लाल झाल्‍यावरच त्‍यांची तोडणी करावी.
जातीपरत्‍वे ( बागायती) हिरव्‍या मिरच्‍यांचे हेक्‍टरी 80 ते 100 क्विंटल उत्‍पादन मिळते. वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन 6 ते 7 क्विंटल येते.